कोटय़वधीचे नुकसान: आर्थिक स्थिती गंभीर, भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह, मार्केट बंद, दुकाने बंद, मालाची हानी
प्रतिनिधी / पणजी
कोरोनामुळे राज्यातील उद्योगधंदे, छोटे व्यवसाय ठप्प झाले असून त्यामुळे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर रोजगार, स्वयंरोजगार बंद झाल्याने आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. रोजंदारीवर काम करणाऱयांची स्थिती अत्यंत वाईट बनली आहे. आर्थिक उत्पन्न नसताना चरितार्थ कसा चालवावा ही मोठी समस्या लोकांसमोर आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योग बंद पडले आहेत. छोटे व्यवसाय, बंद आहेत. मार्केटमधील दुकाने बंद आहेत. गावांमधील दुकाने बंद आहेत. राजधानीतील पणजी मार्केट सुमारे महिनाभर बंद आहे. एवढेच नव्हे तर अन्य शहरातील मार्केट, दुकाने बंद आहेत. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे औद्योगिक उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. औद्योगिक आस्थापनातून काम करणारे कामगार बेकार झाले आहेत. एकूणच राज्याची आर्थिक उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात सध्या आर्थिक मंदी आणि चणचण भासू लागली आहे. उद्योगासाठी बाहेरून येणऱया कच्च्या मालाचा पुरवठाही बंद आहे. त्यामुळे याचे दूरगामी परिणाम गंभीर होण्याची शक्यता आहे.
मार्केट बंद, दुकाने बंद, मालाची हानी
पणजीतील प्रमुख मार्केट गेले सुमारे महिनाभर बंद आहे. त्यामुळे साठून राहिलेला माल खराब झाला आहे. मसाला व्यावसायिक तसेच अन्य छोटे-मोठे व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. छोटय़ा व्यापाऱयांकडून राज्यात दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल चालते. तर औद्योगिक व्यवसायातून कोटय़वधींची उलाढाल होते. गेले सुमारे महिनाभर सर्व व्यवसाय बंद झाल्याने राज्याचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यात मद्याचा व्यवसाय प्रचंड मोठा आहे. या व्यवसायाचीही उलाढाल थांबली आहे.