मुंबई : वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल, त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी. कोविड विरोधात लढताना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन, यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी आदी उपस्थित होते.
२४x७ लसीकरणाची राज्याची तयारी
प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखणे ही आताची प्राधान्याची गरज आहे. लसीकरणामुळे संसर्गाची घातकता कमी होते. त्यामुळे राज्याची २४x७ लसीकरणाची तयारी आहे. जिथे २० बेडस आहेत त्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची परवानगी घेण्यात आली आहे. लसीकरण करतांना लसीची सुरक्षितता ही महत्वाची आहे त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीत लसीकरणाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्याने कडक निर्बंध लावण्याची गरज आहे. आज सायंकाळपर्यंत यासंदर्भात नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.