ऑनलाईन टीम / मुंबई :
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी जाणार का? या विषयाची चर्चा रंगली आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अयोध्याला जाण्यासाठी उद्धव ठाकरे येणार निमंत्रणची गरज नाही असे विधान केले आहे.
राऊत म्हणाले, अयोध्या आणि शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. आमचे हे नाते राजकीय नाही. राजकारणासाठी आम्ही आयोध्येत जात नाही आणि कधी गेलोही नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे हे अयोध्येत गेले आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही.
अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला. राममंदिरात येणारे अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. राम मंदिरासाठी श्रध्देने आणि हिंदुत्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, अयोध्येप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी थेट भाष्य करणे टाळले. देशातील डॉक्टर, पोलीस, नर्स आणि वॉर्ड बॉय हे कोरोनाशी लढत आहेत. बलिदान देत आहेत. आपल्या सर्वांवर देवाचेच आशीर्वाद आहेत, असं सांगत राऊत यांनी या प्रश्नावर अधिक बोलणं टाळले.