प्रतिनिधी/ कराड
उन्हाचा कडाका प्रचंड वाढला असून दुपारी 12 ते 4 या काळात रणरणते ऊन उष्माघाताचे विकार वाढवत आहे. बरोबर याच काळात कराडच्या कोल्हापूर नाका ते अक्षता मंगल कार्यालय रस्त्यावर तासन् तास वाहतूक कोंडी होत आहे. गॅस पाईपाईलनच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून रणरणत्या ऊन्हात वाहनधारक अक्षरशः पिळून निघत आहेत. प्रशासनाने दुपारच्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यावर उपाययोजना करण्याची मागणी तीव्र होत आहे.
कराडला सध्या सेवारस्त्यावर गॅसपाईपलाईनचे सुरू आहे. शहराच्या हद्दीत जिथे कायम वाहतुकीची वर्दळ असते, अशा परिसरातील रस्त्यावर आता हे काम सुरू आहे. भले परवानगी घेऊन काम सुरू झाले असेल त्याबद्दल दुमत नाही. मात्र काम करताना वाहनधारक, परिसरातील पादचारी नागरिक यांची प्रचंड प्रमाणात होणारी गैरसोय सुद्धा विचारात घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीनुसार सेवारस्त्यावर वर्दळीच्या चार ठिकाणी अघळपघळ पद्धतीने काम सुरू आहे. काम करताना सुरक्षितता म्हणून बॅरिगेट लावले असले, तरी कामाचा मलमा रस्त्यावर विस्तारला आहे. त्यामुळे वाहने घसरण्याचे, चिखलात रुतण्याचे प्रमाण वाढले आहे.
उन्हाच्या कडाक्यात कोंडी
दुपारी 12 ते 4 या वेळेत प्रचंड उन्हाचा कडाका वाढत आहे. नेमके याच वेळेत सेवारस्त्यावर वाहतूक केंडीला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला या परिसरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एखादे वाहतूक पोलीस धावाधाव करताना दिसायचे. मात्र आता पोलीसही या वाहतूक कोंडीपुढे हतबल झालेले असावेत. सेवारस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असते. त्यातच पाईपलाईनचे काम सुरू असल्याने वाहने अडकून पडतात. वाहने बाहेर काढता काढता वाहनधारकांचा अक्षरशः फेस निघतो. उन्हाचा कडाका जास्त असल्याने वाहनधारकांच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण होते की काय? अशी भीती वाहनधारक व्यक्त करत आहेत. गॅस पाईपलाईनचे कामात व्यत्यय न येता वाहनधारकांचाही विचार व्हावा, अशी उपाययोजना करण्याची मागणी वाढू लागली आहे.
मलमा ठरतोय अपघाताचे कारण
पाईपलाईनच्या कामाचा मलमा रस्त्यावर अस्ताव्यस्त झालेला असतो. गुरुवारी सायंकाळी नवरंग हॉटेल परिसरात हा मलमा रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. चिखलात वाहने अडकत असल्याने वाहनधारक हैराण झाले होते.