सिनेमाची किंवा त्याच्या समीक्षेची तांत्रिक भाषा मला समजत नाही. अमुक सिनेमा आणि त्यातले तमुक काही आवडते हे सांगता येते. ते श्रे÷ कसे ठरवतात हे मला ठाऊक नाही. सिनेमा माझ्यासाठी पूर्ण भावनिक मामला आहे.
अगदी लहान म्हणजे पहिलीत असताना वडिलांबरोबर त्यांच्या मांडीवर बसून ‘कोहिनूर’ सिनेमा पाहिला होता. पण तेव्हाचे काही स्मरत नाही. दिलीपकुमार गेल्याची बातमी पाहिली तेव्हा ते आठवले, इतकेच. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर ‘मुघले आझम’ पाहिला होता आणि तेव्हाच्या स्वभावानुसार त्यातल्या पल्लेदार भाषेने भारून गेलो होतो.
मात्र सलीम ऊर्फ जहांगीरचे अनारकलीवरचे प्रेम हे किशोरवयीन काफ लव्ह होते आणि नंतर त्याने रीतसर लग्न आणि राज्यकारभार केला म्हटल्यावर ‘मुघले आझम’ आवडायचा थांबला. त्यातले नाटय़मय संवाद नाटकी वाटू लागले.
पण दिलीपकुमारच्या प्रेमात पडणे मला टळले नाही. ‘देवदास’ने प्रेमभंगाच्या दुःखाचे भव्य भरजरीपण साकार केले. दुःख असावे तर इतके मोठे, इतके तीव्र असावे. आपल्याला स्वचा विसर पाडून त्याने आपला सर्वनाश करावा असे काहीसे मनात ठसले. ते तेव्हापासून या क्षणापर्यंत अबाधित आहे.
देवदास पावलोपावली चुकत जातो, हे दिसूनही आपले मन त्याच्यासाठी हळहळते, विदीर्ण होते. अनेकदा चांगली कादंबरी आणि तीवर निघालेला चांगला सिनेमा हे समीकरण जुळतेच असे नाही. पण देवदासच्या बाबतीत कादंबरी आणि सिनेमा एकमेकात पूर्ण विरघळले आहेत, एकजीव झाले आहेत.
कॉलेजच्या दिवसात आणि नोकरी लागल्यावर मॉर्निंग शोला ‘देवदास’ कितीदा तरी पाहिला. त्याचा रिमेक करणारा शाहरुख खान केवळ त्याच कारणास्तव मनातून उतरला. त्याहीपूर्वी गुलजार धर्मेंद्रला घेऊन ‘देवदास’ काढणार अशी बातमी वाचल्यावर देखील प्रचंड संतापलो होतो. माझ्यासाठी दिलीपकुमारशिवाय अन्य कोणी देवदास असूच शकत नाही. ‘देवदास’खेरीज अतिशय आवडलेले चित्रपट म्हणजे ‘यहुदी’, ‘मधुमती’ ‘कोहिनूर’ आणि ‘सगीना’. देवदास आणि सगीना हे दोघे एका अर्थी आउटसायडर्स आहेत. सगीनादेखील आधुनिक कामगार-मालक व्यवस्थेत उपरा ठरतो आणि क्रूरपणे बाजूला टाकला जातो.
दिलीपकुमारच्या जाण्याची बातमी वाचली आणि असे काहीबाही विस्कळीत आठवून गेले. तो शरीराने नसला तरी त्याचे सिनेमे सोबत आहेतच. त्यांच्याशी माझी नाळ न तुटो.