लोकांच्या असहाय्यतेचा धार्मिक लाभ न उठवण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना बरा व्हायचा असेल तर ख्रिश्चनांनी शोधलेली ऍलोपॅथिक उपचार पद्धतीच योग्य ठरेल. हिंदूंची आयुर्वेदिक उपचार पद्धती कुचकामाची आहे, असा प्रचार करणाऱया आणि त्यानिमित्ताने हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रयत्नाला दिल्लीतील न्यायालयाने लगाम घातला आहे. अशी कृत्ये करणाऱया आयएमए या संस्थेचे अध्यक्ष जे. ए. जयलाल यांना न्यायालयाने समज दिली आहे.
जयलाल यांनी आयएमए या संस्थेच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याच्या बहाण्याने ख्रिश्चन धर्माचा प्रसार चालविल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी जयलाल यांच्यावर प्रकरण दाखल करण्यात आले होते. ऍलोपॅथिक ही ख्रिश्चनांची उपचार पद्धती असून तीच कोरोनापासून तुम्हाला वाचवू शकेल. आयुर्वेद या हिंदू औषध पद्धतीचा उपयोग होणार नाही, अशा प्रकारचा अपप्रचार जयलाल यांनी चालविला असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले होते. अशा प्रकारे त्यांनी उपचार पद्धतींची विभागणीही धर्माच्या आधारावर केली आहे, असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. दिल्लीतील न्यायालयात याची सुनावणी झाली.
हे प्रकरण रोहित झा नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यापासून जयलाल यांना रोखावे, अशी विनंती झा यांनी न्यायालयाला केली होती. आपल्या आरोपांचे पुरावे म्हणून जयलाल यांच्या अनेक जाहिर मुलाखतींचा आधार घेतला होता. कोणत्याही संस्थेच्या माध्यामातून उपचारांचे निमित्त करून धर्माचा प्रसार करू नका, असा आदेश त्यांना न्यायालयाने दिला. जयलाल यांनीही धर्मांतरासाठी उपचारांचा उपयोग करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
घटनेची पायमल्ली करू नका
भारताच्या घटनेने सर्व धर्मांना समान लेखले आहे. कोणत्याही धर्माचे श्रेष्ठत्व अन्य धर्मांच्या तुलनेत अधिक नसते. त्यामुळे जयलाल यांनी भारतीय घटनेला अनुसरून आपली वर्तणूक ठेवावी. तसेच आपल्या पदाची शान राखावी, त्याचबरोबर कोणाचाही अवमान होईल किंवा कोणत्याही पद्धतीची बदनामी होईल अशी वक्तव्ये त्यांनी करू नयेत, असा परखड आदेश त्यांना देण्यात आला.
कोरोनाचा लाभ उठवू नका
जयलाल हे कोरोना व्याधीने ग्रस्त झालेल्यांच्या असहाय्यतेच्या धार्मिक लाभ उठवित आहेत. त्यांना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. त्यांची ही कृती भारतीय कायदा आणि घटना यांच्या विरोधात आहे. असे तक्रारदारांनी अर्जात म्हटले होते. न्यायालयाने तक्रार मान्य करत जयलाल यांना फटकारले आहे.