नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात ओसरू लागल्याचे दिसत आहे. तसेच आतापर्यंत पेलेल्या चाचण्यांची संख्या आता 9 कोटींच्या वर गेली आहे. गेले सलग 10 दिवस नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एप्रिलपासून प्रथमच उपचार घेणाऱया कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवडाभरात घटली आहे.
चाचण्यांची संख्या वाढूनही नव्या बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. मात्र, लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.
सात दिवसांपूर्वी उपचार घेणाऱया कोरोनाग्रस्तांची संख्या साडेनऊ लाखांहून अधिक होती. ती बुधवारी 8 लाख 26 हजारांपर्यंत खाली आली आहे. यावरून कोरोनाचा उद्रेक आता काही प्रमाणात आटोक्यात आला असल्याचे दिसते. मात्र, याचा अर्थ या विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात आले आहे, असा होत नाही.
परिणामी, लोकांनी एकमेकांपासून शारिरीक अंतर राखणे आणि मुखावरणाचा उपयोग करणे हे उपाय केलेच पाहिजेत. निष्काळजीपणाला मुळीच स्थान देण्यात येऊ नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
10 राज्यांमध्येच प्रभाव
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव केवळ 10 राज्यांमध्ये दिसून येत आहे. बुधवारी सापडलेल्या नव्या 63 हजार 509 रूग्णांपैकी 80 टक्के याच राज्यांमध्ये आढळले आहेत. केरळ राज्यात बुधवारी देशातील सर्वाधिक रूग्ण आढळले असून त्यांची संख्या 8 हजार 764 आहे. तर महाराष्ट्रात ती त्यापेक्षा कमी म्हणजे 8 हजार 522 इतकी आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रथमच कोणत्या तरी राज्याने प्रतिदिन रूग्णसंख्येत महाराष्ट्राला मागे टाकण्याची घटना घडली आहे.
मृत्यूंच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर
मंगळवार संध्याकाळ ते बुधवार संध्याकाळ या 24 तासांमध्ये देशभरात 730 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यापैकी साधारणतः 25 टक्के, म्हणजे 187 मृत महाराष्ट्रातील आहेत. तर 90 टक्के मृत्यू केवळ 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घडलेले आहेत. यापुढच्या काळात याच राज्यांवर व केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे, असे प्रतिपादन मंत्रालयाने केले.
रूग्णसंख्यावाढ 1 टक्याहून कमी
गेल्या सलग एक महिन्यात देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढीचा प्रतिदिन वेग 1 टक्क्याहून खाली घसरला आहे. हे शुभचिन्ह असून विषाणूचा प्रसार रोखण्यात यश येत असल्याचा हा परिणाम आहे. यापुढच्या काळात हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, रूग्णंसख्या दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांहून अधिक होणार आहे. एक महिन्यापूर्वी तो 40 दिवस इतका होता, अशीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळासाठी
कोरोना संसर्गातून बऱया झालेल्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती पुढे अनेक महिने टिकून राहते, असे संशोधनाअंती आढळल्याची माहिती अमेरिकेच्या ऍरिझोना विद्यापीठाच्या संशोधकांनी दिली आहे. ही रोगप्रतिकारशक्ती 5 महिन्यांहून अधिक काळ टिकून राहते. या कालावधीत या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता जवळपास नसते. मात्र, अशा बऱया झालेल्या व्यक्तींनी नव्याने संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही संशोधकांनी आवर्जून स्पष्ट केले.