लॉकडाऊनमुळे वाहनांची सोय दुरापास्त :पेन्शन घेण्यासाठी नातेवाईकांची मदत
प्रभागनिहाय दोन रिक्षा सेवेसाठी तत्पर ठेवणे आवश्यक
महेश शिंपुकडे / निपाणी
वृद्धापकाळात प्रत्येक वृद्धाला विविध आजार होतात. अशा वृद्ध रुग्णांना नियमितपणे औषधोपचार होणे गरजेचे असते. औषधांचा डोस अथवा नियमितपणे होणारी तपासणी थांबल्यास वृद्ध रुग्णांची त्रासातून तळमळ वाढते. पण सध्या लॉकडाऊनमुळे अधिकतर खासगी दवाखाने बंद आहेत. सरकारी दवाखान्यामध्ये कोरोना संशयित रुग्णांनाच अधिकतर सेवा दिली जात आहे. अशातच वाहनांची सोयही दुरापास्त झाली असून उपचार घेण्यासाठी वृद्ध रुग्णांची वाढती धडपड चिंतनीय बनली आहे.
निपाणीत सध्या पोलीस प्रशासनाच्या कार्यतत्पर कारवाईतून लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी ही बाब योग्य आहे. असे असले तरी वृद्ध रुग्णांची होणारी गैरसोय, पेन्शनधारकांची होणारी अडचण लक्षात घेणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याची मुभा देणाऱया प्रशासनाने या समस्येकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा उपचाराविना वृद्ध रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निपाणीत बहुतांशी खासगी दवाखाने बंद ठेवण्यातच डॉक्टरांनी धन्यता मानली आहे. सुरक्षेच्या बाबतीत विचार केल्यास ते योग्यही आहे. पण नियमित उपचारांची गरज भासणाऱया रुग्णांना सेवा कशी मिळणार? हा देखील तितकाच गंभीर प्रश्न आहे. सरकारी दवाखाने सुरू ठेवण्यात आले असले तरी तेथे कोरोना संशयित रुग्णांचा वावर अधिक असल्याने, तेथे जाण्यास कोणताही रुग्ण जाण्यास तयार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोणाही रुग्णाला आवश्यक उपचारासाठी दवाखान्यापर्यंत पोहचण्याकरिता वाहनांची गरज भासते. पण रिक्षा किवा अन्य कोणतेही खासगी वाहन बाहेर काढण्यास कोणीही तयार नाही. यामुळे रुग्णासह कुटुंबीयांची गैरसोय होताना दिसते. यासाठी खासगी वाहनांना नसेना पण किमान प्रभागनिहाय एक किवा दोन रिक्षा सेवेसाठी तत्पर ठेवणे आवश्यक आहे. निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांना पेन्शन मिळविण्यासाठी बँकेपर्यंत जावे लागते. बँकांचे कामकाज सुरू असले तरी बँकेपर्यंत पोहचण्यासाठी पेन्शनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नातेवाईक असोत किवा वाहनधारक अशा पेन्शनधारकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठी एक चिंता बनत आहे. यामुळे शासनाकडून वेळोवेळी दिले जाणारे निर्देश पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पण अशा परिस्थितीत वृद्ध रुग्ण, पेन्शनधारकांची होणारी गैरसोय देखील दुर्लक्षित होऊ नये, अशी माफक अपेक्षा जनमाणसातून होत आहे.