सांगली \ ऑनलाईन टीम
राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. आज या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली दौऱ्यावर आहेत. ते सांगलीतील वेगवेगळ्या भागाची पाहणी करत आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करत आहेत. कोल्हापूरपासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अजित पवारांनी सांगलीपासून दौऱ्याला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी येथील निवारा केंद्राला भेट दिली. भिलवडी पाहणी करत असताना उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण होऊ शकलं नाही. त्यातच कोल्हापूरकडे जाणारे रस्ते बंद असल्यानं अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली. हेलिकॉप्टर उपलब्ध झालं, तर दुपारनंतर कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, सांगलीतील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री सांगलीत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्याला रवाना होणार आहेत.
चिपळूणच्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सोमवारी (दि. २६) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच, महापुराने बाधितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावणीला भेट देत स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.
live update :
उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीतील भिलवडीत दाखल.
अजित पवरा यांच्याकडून भिलवडीतील निवारा केंद्राची पाहणी करण्यात आली.
यानंतर अजित पवार, पलूस, सांगली शहराची पाहणी करणार आहेत.
त्यांच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम आहेत. भिलवडीतील निवारा केंद्रात जाऊन त्यांनी स्थानिकांची विचारपूस केली.
तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली.