कार्तिकी रद्द झाल्याने वारकरी आक्रमक
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
कार्तिकीवारी मध्ये जर वारकऱ्यांना निर्बंध असतील, यात्रा होणार नसेल, तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील महापूजेला येऊ नये. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्ते महापूजा करावी, असा पवित्रा घेत वारकरी सांप्रदाय आता आक्रमक होत आहे. शिवाय कार्तिकी यात्रा रद्द केल्याने आगामी पदवीधर निवडणुकीमध्ये संप्रदायाच्या वतीने बहिष्कार टाकण्याची भूमिका नुकतीच ह. भ. प. राणा महाराज वासकर आणि रामकृष्ण वीर यांनी जाहीर केली.
शुक्रवारी संध्याकाळी राज्य शासनाच्या वतीने वारी रद्द करण्यात यावी, अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी एकादशी दिवशी आणि त्यापूर्वी संचारबंदी पंढरपुरात लागू करणार आहे. तर 22 नोव्हेंबर पासून येथील एसटी सेवादेखील बंद होत आहे. विठोबाचे दर्शन देखील बंद करण्याचा निर्णय करण्यात आला. एकंदरीत संपूर्ण कार्तिकी यात्रा रद्द झाली.
वारकरी संप्रदायातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून कार्तिकी यात्रा भरू द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कार्तिकी यात्रा भरली नाही, तर वारकरी संप्रदाय मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही दिला होता. त्याप्रमाणे आता संप्रदायाच्या वतीने आगामी पदवीधर निवडणुकीपासून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वारकरी संप्रदायातील विविध संघटनांच्या वतीने नुकताच घेण्यात आला. याबाबत येथील वासकर वाड्यात बैठक देखील शनिवारी सकाळी संपन्न झाली.
एकीकडे वारकरी संप्रदाय मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका विषद करत असताना दुसरीकडे येणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरात येऊ नये, वारकरी येणार नसतील, तर उपमुख्यमंत्र्यांनीही येऊ नये. एकादशी दिवशी विठोबाची महापूजा येथील प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न करावी, परगावहूनही अधिकारी वर्गानी येऊ नये. अशी भूमिका विषद करत आता वारकरी कार्तिकीबाबत आक्रमक झालेले दिसून येत आहेत.