प्रतिनिधी / पंढरपूर
कार्तिकी वारीमध्ये जर वारकऱयांना निर्बंध असतील. यात्रा होणार नसेल तर उपमुख्यमंत्र्यांनी देखील महापूजेला न येता, स्थानिक अधिकाऱयांच्या हस्ते महापूजा करावी, असा पवित्रा घेत वारकरी सांप्रदाय आता आक्रमक होत आहे. शिवाय कार्तिकी यात्रा रद्द केल्याने आगामी पदवीधर निवडणुकीवर संप्रदायाच्या वतीने बहिष्कार टाकण्याची भूमिका हभप राणा महाराज वासकर आणि रामकृष्ण वीर यांनी जाहीर केली. याबाबत येथील वासकर वाडय़ात शनिवारी सकाळी बैठक झाली.
शुक्रवारी संध्याकाळी राज्य शासनाच्या वतीने वारी रद्द करण्यात यावी, अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी एकादशी दिवशी आणि त्यापूर्वी पंढरपुरात संचारबंदी लागू करणार आहे, तर 22 नोव्हेंबरपासून येथील एसटी सेवादेखील बंद करण्यात येणार आहे. विठोबाचे दर्शनदेखील बंद करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
एकंदर कार्तिकी यात्रा रद्द झाली. वारकरी संप्रदायातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन समन्वय समितीच्या माध्यमातून कार्तिकी यात्रा भरू द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कार्तिकी यात्रा भरली नाही, तर वारकरी संप्रदाय मतदानावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही दिला होता. त्याप्रमाणे आता संप्रदायाच्या वतीने आगामी पदवीधर निवडणुकीपासून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय वारकरी संप्रदायातील विविध संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत येथील वासकर वाडय़ात शनिवारी सकाळी बैठक झाली.
कार्तिकी यात्रा न झाल्याने वारकरी संप्रदाय, महाराज मंडळी आता अनेक वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन तसेच प्रवचन, कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना वारकऱयांना मतदान न करण्याचे आवाहन करणार आहेत. तसेच सरकारची कार्तिकी वारीबद्दलची मानसिकता लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ठरवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
परगावच्या अधिकाऱयांनाही विरोध
एकीकडे वारकरी संप्रदाय मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका विषद करत असताना, दुसरीकडे येणाऱया कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरात येऊ नये, वारकरी येणार नसतील तर उपमुख्यमंत्र्यांनीही येऊ नये. एकादशी दिवशी विठोबाची महापूजा येथील प्रांताधिकाऱयांच्या हस्ते करण्यात यावी. परगावहूनही अधिकारी वर्गानी येऊ नये, अशी भूमिका विषद करत आता वारकरी कार्तिकीबाबत आक्रमक झालेले दिसून येत आहेत.