नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेचा प्रारंभ मंगळवारपासून झाला आहे. मंगळवारी आवेदने सादर करण्याचा प्रथम दिवस होता. आवेदन (अर्ज) देण्याचा अंमित दिनांक 19 जुलै हा आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. ही निवडणूक 6 ऑगस्टला होणार आहे.
सध्या उपराष्ट्रपतीपदी व्यंकय्या नायडू हे आहेत. त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टपर्यंत आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्षही असतात. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा यांचे सदस्य मतदान करु शकतात. त्यांच्यात नामनिर्दिष्ट सदस्यांचाही समावेश असतो. या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांशिवाय अन्य कोणींही मतदान करु शकत नाहीत, असा नियम आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदारांची एकंदर संख्या 788 इतकी आहे.
या निवडणुकीसाठी अर्ज करणाऱया उमेदवाराला 20 अनुमोदक आणि 20 समर्थक अशा किमान 40 मतदारांचा पाठिंबा असावा लागतो. अनुमोदक आणि समर्थकांनी उमेदवारी अर्जावर स्वाक्षऱया कराव्या लागतात. एक उमेदवार अधिकतम चार आवेदनपत्रे (अर्ज) सादर करु शकतो. 1,500 रुपये अनामत द्यावी लागते.
प्रकियेचे वेळापत्रक
5 जुलै आवेदन सादरीकरणास प्रारंभ
19 जुलै आवेदन सादरीकरण अंतिम दिनांक
20 जुलै आवेदनांची छाननी
22 जुलै आवेदन परत घेण्याचा अंतिम दिनांक
6 ऑगस्ट मतदान (आवश्यकता असल्यास)
6 ऑगस्ट मतगणना आणि निर्णय