वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात ऑक्सिजनच्या उत्पादनामध्ये कोणताही तुटवडा नाही. मात्र, ऑक्सिजनच्या वितरणामध्ये समस्या निर्माण झाल्या असून या त्रुटी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. लवकरच परिस्थितीमध्ये सुधारणा अपेक्षित असून तोपर्यंत उपलब्ध ऑक्सिजन अत्याधिक आवश्यक वस्तू म्हणून उपयोगात आणावा, असा आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिला आहे. राज्य सरकारांजवळ उपलब्ध असणारा ऑक्सिजन केवळ जीव वाचविण्यासाठीच उपयोगात आणला जावा. त्याचा अन्य कोणताही उपयोग करू नये. ज्या रुग्णांना ऑक्सिजन दिल्यावाचून गत्यंतर नाही, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यामध्ये प्राधान्य देण्यात यावे. ऑक्सिजनची साठेबाजी करणाऱयांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अशी कारवाई करण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या कार्यकक्षेत येत असल्याने त्यांनी कोणतीही हयगय न करता आपल्या अधिकारांचा वापर करावा, असेही केंद्र सरकारने सूचित केले आहे.
ऑक्सिजन सिलिंडरची आयात
केंद्र सरकारने गेल्या आठ दिवसांत 1 लाख 2 हजार 400 ऑक्सिजन सिलिंडर्सची खरेदी केली आहे. हे सर्व सिलिंडर्स राज्य सरकारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुरविण्यात आले आहेत. आणखी 1 लाख सिलिंडर्सची खरेदी येत्या पंधरा दिवसात होणार असून त्यांचा पुरवठाही राज्य सरकारांना केला जाईल. या सिलिंडर्सची साठेबाजी होणार नाही, याकडे राज्य सरकारांनी डोळय़ांत तेल घालून लक्ष पुरवावे, असाही निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
उत्पादन वाढविणार
पंतप्रधान केयर्स निधीतून 551 ऑक्सिजन उत्पादन केंद्रांसाठी आर्थिक साहाय्य घोषित करण्यात आले असून येत्या दोन महिन्यात ही केंदे स्थापन केली जातील. त्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच सामग्री खरेदी करण्यात येईल. ज्या राज्यांना ऑक्सिजनची अधिक आवश्यकता आहे तेथे प्राधान्याने ही सयंत्रे बसविण्यात येतील, असेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
छोटय़ा शहरांमध्ये प्रादुर्भाव
नव्या कोरोनाचा प्रादुर्भाव छोटय़ा शहरांमध्ये विशेषत्वाने दिसून येत आहे. टायर-2 आणि टायर-3 शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढत असून मृत्यूदरातही काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. तथापि, रुग्णांच्या नातेवाईकांनी भीतीच्या प्रभावाखाली येऊन रेमिडेसिविर किंवा टोसिलिझुमाब या औषधांचा स्वतःच्या मताने वापर करू नये. तसे केल्यास जिवाला धोका संभवू शकतो. रेमिडेसिविर हे जीवरक्षक औषध नाही. गंभीर स्थितीतील रुग्णावर ते परिणामकारक ठरू शकत नाही. ते केवळ सौम्य कोरोना असणाऱयांनाच उपयोगी पडू शकते, याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य विभागाने पुन्हा एकदा केला आहे.