आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उपवासाच्या पदार्थांची आवक
प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी आषाढी एकादशी असल्याने बाजारात उपवासाच्या पदार्थांची आवक आणि मागणी वाढली आहे. विशेषतः वरी, साबुदाणा, शेंगदाणा, खजूर, राजगिरा लाडू आणि फळांची मागणी वाढली आहे. वर्षभरातील महत्त्वाच्या उपवासांपैकी आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्त्व मोठे असल्याने आबालवृद्धांकडून उपवास करण्यात येतो. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे.
आषाढी आणि कार्तिकी या महाएकादशी म्हणून ओळखल्या जातात. या एकादशींना उपवास करणाऱयांची संख्या अधिक असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांना अधिक पसंती दिली जाते. बाजारात साबुदाणा 70 रु. किलो, वरी तांदूळ 120 रु. किलो, खजूर 100 रु. किलो, राजगिरा लाडू 20 रु. पाकीट, काळा खजूर 320 रु. किलो असा दर आहे. यामध्ये वरी तांदळाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. याबरोबरच केळी, सफरचंद, सीताफळ, डाळिंब, पेरू आदी फळांची देखील मागणी वाढली आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे आषाढी एकादशी केवळ प्रतिकात्मक रुपात साजरी झाली होती. दरम्यान बाजारपेठेवर देखील निर्बंध आले होते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची आवक कमी झाली होती.
दर्शनासाठी मंदिरांमध्ये होणार गर्दी
मागील दोन वर्षात कोरोनामुळे मंदिरांवर निर्बंध आले होते. मात्र यंदा जनजीवन पूर्वपदावर आल्याने मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारी आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल मंदिरांतून दर्शनासाठी गर्दी होणार आहे.