भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत, त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे. अनेक देवदेवता, त्यांची नवरात्र, शिवाय रामनवमी, हनुमानजयंती, जन्माष्टमी, गणेशजयंती असे अनेक उपवास, याखेरीज महाशिवरात्र, आषाढी आणि कार्तिकी एकादशी, मासिक नियमित उपवासांमध्ये चतुर्थी, दोन एकादशा , प्रदोष आणि शिवाय साप्ताहिक ज्याचा त्याचा सोमवार ते रविवार असा कोणताही वार, अशी ही न संपणारी जंत्री आहे.
बरं, ‘उपवास का करता?’ असं विचारलं तर त्याचं पटेल असं उत्तर कोणालाही सांगता येत नाही. आमच्या घरची पद्धत आहे , लहानपणापासून करत आलो आहोत, अहो देवाचं असं मधेच सोडता येतं का अशी उत्तरं आणि प्रतिप्रश्न आपणास ऐकावयास मिळतात.
उपवास म्हणजे जवळ बसणे म्हणजे काय तर शरीराची, खाण्याची चिंता सोडून सगळे तनमन देवाशी एकाग्र करून देवाच्या सान्निध्यात बसणे. आपल्यापैकी किती जण असा उपवास करतात सांगा पाहू? उलट भजन, कीर्तन करून येणाऱया बायकांची चर्चा ऐकली तर हसू येते. ‘चला, जाता जाता मला केळी, खजूर आणि राजगिरा लाडू घ्यायचे आहेत, घरी जाऊन खिचडी परतायची आहे,’ असे संवाद ऐकू येतात. काही विशेष उपवास म्हणजे जे सामान्यपणे सगळय़ा कुटुंबाने करणे अपेक्षित असते, तेव्हा तर विचारूच नका, बायकांचा पूर्ण दिवस स्वैपाकघरात जातो. उपासाला चालणारे असे म्हणून जेव्हढे काही पदार्थ असतील, ते सगळे ताटात अवतीर्ण होतात. साबुदाणा, शेंगदाणे, भगर, राजगिरा, बटाटे, रताळी काही काही बाकी ठेवलं जात नाही. त्यामुळे उलट नेहमीचं जेवण परवडलं असं आपलं पोट म्हणत असेल. त्यामुळेच ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही जी म्हण आपल्याकडे उपासाच्या बाबतीत वापरली जाते ती बरोबरच आहे .
उपवासाचे सगळे पदार्थ खाऊन पित्त वाढते, बटाटे खाऊन पोट गुबारते, गच्च होते. मग दुसऱया दिवशी कोणाचं डोकं दुखतं, कोणाला उलटय़ा होतात, कोणाला जुलाब तर कोणाला अजीर्ण नाहीतर मलबद्धता. लंघन करून या पचनशक्तीला मदत करण्याच्या हेतूने उपवासाची योजना केलेली आहे. तळलेले खाऊ नये, जड खाऊ नये, हलकाच आहार घ्यावा, हे सगळे नियम आपल्या शरीराच्या भल्यासाठीच आहेत पण आपण ते सगळे नियम धाब्यावर बसवून आपल्याला आवडतील, जिभेचे चोचले पुरवतील असे पदार्थ शोधून शोधून खातो.
खरं तर उपवास किंवा लंघन ही एक अतिशय उपयोगी अशी चिकित्सा म्हणून आयुर्वेदानेही वर्णन केली आहे. काही आजार असे असतात की ज्यात अन्न खाण्याने किंवा नियमित आहार घेण्यामुळे दोष आणि पर्यायाने तो आजारही वाढतो, म्हणून मग पूर्ण उपास किंवा केवळ गरम पाणी, फक्त दूध, पेज, पातळ भात किंवा कढण असा आहार वैद्याकडून सुचवला जातो, जो औषधाचा परिणाम अधिकच सुधारण्यास मदत करतो.