कोल्हापूर नाक्यावर अपघातांची मालिका थांबेना
प्रतिनिधी/ कराड
कराडचे प्रवेशद्वार असलेला कोल्हापूर नाका आता बदनाम झाला आहे. नाक्यावर मिनिटा-मिनिटाला जीवघेणी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. कोल्हापूर-पुणे आशियाई मार्गावरील भरधाव वाहनांचा वेग आवरला जात नाही. केवळ फलक, सीग्नल लावून वेगावर मर्यादा येत नसल्याने महामार्ग ओलांडताना शुक्रवारी एका शिक्षिकेचा गंभीर अपघात झाला. वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणारी ठोस उपाययोजना कृतीत उतरण्यावर स्थानिक नेत्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे, तर प्रशासनही चिडीचूप होऊन झाला अपघात की पंचनामा करा एवढाच उद्योग करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शुक्रवारी कोल्हापूर नाक्यावर नगरपालिका शाळेतील शिक्षिकेच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यापूर्वी 14 दिवस अगोदर कराड शहरात प्रवेश करताना एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कोल्हापूर नाक्यावर होणारे हे अपघात आत्ताचे नाहीत, तर या नाक्यावर मोजता येणार नाहीत एवढे अपघात झाले आहेत. कोल्हापूर नाका हा अपघातांच्या मालिकेने बदनाम झाला आहे. कारण ज्याचा अपघात होतो, त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अपघातात जखमी झालेल्यांना बरे करताना अनेक कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरू असते. एका बाजूला कोल्हापूर नाक्यावरील अपघातांच्या बदनामीचा डाग ठळक होत असताना दुसरीकडे भरधाव वेगाला नियंत्रणात ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरतेय, असा आरोप नागरिक करत आहेत. नेत्यांनी मात्र पाहणी केली, भाषणे केली, मात्र कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहनांचा वेग काही कमी झाला नाही. प्रत्येकवेळी नियमावर बोट ठेवून प्रशासनाने हात झटकले, तर नेत्यांनी तोंडावर बोट ठेवले. त्यामुळे कोल्हापूर नाक्यावर होणारे अपघात हे फक्त नियमांवर बोट ठेवल्यानेच अनेकांच्या जीवाशी खेळत आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने उभारलेल्या कमानीसमोर, ‘आय लव्ह कराड’ सेल्फी पॉइंटसमोर तसेच महामार्गावर सुरू असलेली जीवघेणी कसरत थांबवण्यासाठी उड्डाणपूल होईपर्यंत नेते आणि प्रशासन ठोस काही करतील का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कोल्हापूर नाक्यावर गेलेल्या बळींना श्रद्धांजली वाहण्यापेक्षा, जखमी झालेल्यांप्रति पोकळ संवेदना दाखवण्यापेक्षा नेते व प्रशासनाने आता प्रत्यक्ष कोल्हापूर नाक्यावर तासभर थांबून काय उपाययोजना करता येतील, यावर विचार करायला हवा, असा टाहो सामान्य वाहनधारक फोडत आहेत.