भिडे गुरुजींचे वक्तव्य चुकीचे, आमदार शिवेंद्रराजेनी थेट साधला निशाणा
प्रतिनिधी/ सातारा
मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले. त्यावेळीच जर सरकारने पुढे दुसरी लाट येवू नये किंवा आल्यास काय उपाययोजना कराव्यात याचा विचार केला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राज्य सरकार नियोजनामध्ये ढिले पडले आहे, असा आरोप भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, सांगली येथे भिडे गुरुजींनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
साताऱयात आमदार शिवेंद्रराजे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, रेमडेसीवरच्या इंजेक्शनच्या तुटवडय़ाबाबत मी रेमडेसीवरचे जे डिलर आहेत. आप्पा शिंदे यांच्याशी बोललो आहे. त्यांना स्वतः लक्ष घालायला सांगितले आहे. राज्याचे आणि देशाचे रेमडेसीवरचे डिलर आहेत. त्यांनीही सांगितले आहे की लस देण्याबाबत गरज पडली तर वरच्या पातळीवरुन प्रयत्न करु असे सांगत ते म्हणाले, लसीचा काही स्टॉक सातारा जिह्यात येतो आहे. अजून लस लागली तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लस कशी पोहचेल याचा प्रयत्न आहे.
भिडे गुरुजींचे वक्तव्य चुकीचे
पत्रकारांनी आमदार शिवेंद्रराजे हे भाजपाचे असल्याने भिडे गुरुजींनी सांगलीत कोरोनाबाबत केलेल्या वक्तव्यांवरुन छेडले असता आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, भिडे गुरुजींचे वक्तव्य चुकीचे आहे. कोरोना कोणालाही होवू शकतो. शेवटी व्हायरसला काय कोण शुर आहे आणि कोण बलवान आहे हे माहिती नसते. कोरोना कोणालाही होतोय. मग तेथे सर्वसामान्य असुदे नाहीतर पैसेवाले असू देत. अनेक मोठमोठी लोक कोरोनामुळे दगावली. कोरोना कोणालाही होवू शकतो. असं माझ तरी म्हणण आहे, असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
राज्य सरकारवर साधला निशाणा
पुढे आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, सरकार अपयशी ठरलय याच्यापेक्षा थोडाफार मध्यतंरीच्या काळात पेशंट कमी झाले. त्यावेळेला दुसरी लाट येईल याचा विचार करुन सरकारने जी थोडफार तयारी करायला पाहिजे होती. बेडची तयारी आहे काय नाही. रेमडेसीवरचा स्टॉक आहे काय याची सगळी तयारी करुन ठेवायला पाहिजे होती. गरज पडली तर वापरायचे होते. नाही पडली तर तशीच राहिली आहे. त्यामध्ये थोडीफार ढिलाई दिसते. मध्ये रुग्ण कमी झाले त्यावेळी सरकार कमी पडले हे जाणवते, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.