प्रतिनिधी/गोडोली
ग्रामीण भागात लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांच्या घरात उपासमारीची वेळ आली आहे. गावात रेशनिग दुकानात वितरकांने ग्राहकांना स्वतःच्या थमव्दारे मशीनमधून पावती काढून ग्राहकांना दयावी, अशा सुचना असताना पावती न देता २० ते ५० रूपये घेतले जावू लागले असल्याच्या तक्रारी प्रशासनाच्या समोर अडचणी वाढवू लागल्या आहेत.
गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल ही मंडळी धान्य वाटपाकडे लक्ष देत नसल्याने ही उपासमार होणारांची लुटमार होत आहे. पावती न देता जादा पैसे घेत धान्य वाटप करणाऱ्या रेशनिंग दुकानावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या कडून होऊ लागली आहे.
शासनाने दि.१ एप्रिल पासून रेशनिंग दुकानातून धान्य वाटप सुरू केले आहे. पुढील ३ महिने वॉर्डनिहाय ग्राहकांना बोलवून धान्य वाटप करण्याबरोबर दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही आणि गावातील गरजू व्यक्ती धान्यापासून वंचित राहणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्याबाबत वितरकांना लेखी सुचना जिल्हयात दिल्या आहेत. गावातील धान्य वाटपावर गाव पातळीवरील ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष, सदस्य, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांनी धान्य वाटपात लक्ष ठेवण्याच्या तहसिलदारांनी सक्त सुचना दिल्या आहेत. तरी ही सामान्य नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तक्रारी प्राप्त झाल्यावर कडक भाषेत संबंधित वितरकांना तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी सूचना दिल्या आहेत.
सातारा तालुक्यात प्राधान्य कुटुंब, अंत्योदय, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेर्तंगत रेशनिंग दुकानात धान्य वाटपासाठी दिवस निश्चित केले आहेत. धान्य घेतल्यावर पावती घ्यावी. पावती न देता, ज्यादा रक्कम घेतले गेल्यास तहसिलदार, सरपंच, तलाठयांना कळवा. ज्या दुकानदारांच्या विरोधात तक्रार आल्यास त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई केली जाईल, असे सातारच्या तहसिलदार आशा होळकर यांनी सांगितले.