‘मुलुखमाती’ संपत मोरे लिखित कादंबरीवर ऑनलाईन राज्यस्तरीय ‘परिसंवाद’
विटा / प्रतिनिधी
येथील आदर्श महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी , कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा केला.या दिनाचे औचित्य साधत संपत मोरे लिखित ‘मुलूखमाती’या कादंबरीवर ऑनलाइन राज्यस्तरीय परिसंवाद आयोजित केला.
प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या उपेक्षित माणसांच्या अलक्षित जगण्याला लोकांसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न संपत मोरे यांच्या लेखणीने केला आहे .मुलूखमाती हे वेगवेगळ्या मुलखातील आणि मातीतील परिघाबाहेरील लोकांचे व्यक्तिचित्रण वाङ्मयीन इतिहासात मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन डॉ.संदीप सांगळे यांनी केले.आदर्श कॉलेज विटा यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त संपत मोरे लिखित मुलूखमाती पुस्तकावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवाद कार्यक्रमानिमित्त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श कॉलेजचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब कोरे हे होते.
यावेळी बोलताना पत्रकार व संपादक धर्मेंद्र पवार म्हणाले,” महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरही असणाऱ्या वेगवेगळ्या भू – सांस्कृतिक प्रदेशाच्या संयोगातून निर्माण झालेल्या लोकांच्या जगण्याचा चरित्रपट संपत मोरे यांच्या लेखनातून अभिव्यक्त झाला आहे” .बाळासाहेब कांबळे यांनी लेखक परिचय व लेखकाची भूमिका विषद करताना सांगितले, “ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून संपत मोरे यांनी आपली कारकीर्द सुरू करून तळागाळात दडलेल्या अनेक व्यक्तिरेखांना उजेडात आणले असून, या व्यक्तिरेखा मधून अनेक कलाकार, खेळाडू ,साहित्यिक यांचे भावबंध उलगडले गेले आहेत”. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे सर म्हणाले, २७ फेब्रुवारी हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. संपत मोरे यांनी गावोगावच्या लोकविलक्षण कथा मुलूखमातीमधून सांगितल्या आहेत . व्यक्ती आणि प्रदेशाच्या संयोगातून निर्माण झालेला भू -समाज सांस्कृतिक अवकाशाचा समाजपट या लेखनात केंद्रीय स्वरूपात आहे . म्हणूनच आदर्श महाविद्यालयातील मराठी विभागाने मुलूख माती भू: सांस्कृतिक प्रदेश व व्यक्तिचित्रण या विषयावर परिसंवाद आयोजित केला. मुलुखमाती चे लेखक श्री. संपत मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले माझ्या महाविद्यालयाने हा परिसंवाद आयोजित करणे म्हणजे माहेरच्या माणसांनी कौतुक केल्यासारखे आहे.महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ .मानसी जगदाळे यांनी प्रस्ताविक करून लेखक संपत मोरे हा या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त केला. डॉ .सुनिता रोकडे यांनी आभार मानले .विनायक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या परिसंवादात डॉ. संभाजी शिंदे,प्रा .अजय काटे ,प्रा.राजेंद्र जाधव, श्री.प्रशांत पवार ,कुंदा लोखंडे ,प्रशांत परदेशी, चंद्रकांत हुलगे , डॉ श्यामसुंदर मिरजकर, विजय मांडके,डॉ.शीतल पाटील,शैलजा टिळे व इतर मान्यवर साहित्यिक सहभागी झाले.या कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते . तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार उपस्थित होते.त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.