वृत्तसंस्था/ बँकॉक
उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत गटातील शेवटच्या साखळी लढतीत भारताला कोरियाकडून 0-5 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत पीव्ही सिंधूला जागतिक चौथ्या मानांकित ऍन सेयुंगकडून पुन्हा एकदा पराभूत व्हावे लागले.
गट ड मधील आधीच्या दोन लढतीत भारतीय महिलांनी कॅनडा व अमेरिका यांचा पराभव केला होता. पण त्या कामगिरीची पुनरावृत्ती भारतीय महिलांना कोरियाविरुद्ध करता आली नाही. या युवा संघाचे एकप्रकारे रिऍलिटी चेकच झाले असून या लढतीत एक गेमही भारतीय खेळाडूंना जिंकता आला नाही. मात्र लढत गमविली असली तरी गटात दुसरे स्थान मिळवित भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.
पीव्ही सिंधूसाठी हा पराभव निराशाजनक ठरला. ऍन सेयुंगकडून झालेला तिचा हा सलग पाचवा पराभव आहे. सेयुंगने सिंधूवर 21-15, 21-14 अशी मात केली. श्रुती मिश्रा व सिमरन सिंघी या दुहेरीच्या जोडीला जागतिक द्वितीय मानांकित ली सोही व शिन सेयुंगचॅन यांच्याकडून 13-21, 12-21 असा 39 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. तिसऱया सामन्यात आकर्षी कश्यपचा किम गा युनने 21-10, 21-10 असा धुव्वा उडवित 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. नंतरच्या दोन सामन्यात किम हय़े जेआँग-काँग हीयाँग यांनी तनिशा क्रॅस्टो व ट्रीसा जॉली यांचा 21-14, 21-11 असा पराभव केला तर अश्मिता चलिहा सिम युजिनकडून 18-21, 17-21 अशी पराभूत झाली. भारतीय पुरुष संघाची तिसरी लढत चिनी तैपेईशी होत आहे.