जिल्हाधिकाऱयांची बैठकीत प्रसार माध्यमांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोणत्याही उमेदवारावर टीकात्मक वृत्त प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या मार्गसुचीनुसार कारवाई केली जाईल. आश्वासने तसेच अधिक स्तुती करून इतरांना कमी लेखन्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तर त्यावरही नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणूक शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनी केले आहे.
काही वृत्तपत्रांमधून पेडन्यूज प्रसिद्ध करण्यात येतात. त्यावर एमसीएमसी विभाग करडीनजर ठेवणार आहे. सर्वच वृत्तपत्रांमध्ये एकसारख्या बातम्या प्रसिद्ध होत असल्यास त्यावरही नजर ठेवली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होवू नये याची दखल घेण्यासाठी निवडणूक आयोग नजर ठेवून असून त्याची दखल सर्व वृत्तपत्रांनी तसेच माध्यमांनी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले आहे.
मतदानाच्या आधी 48 तासांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर त्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्र प्रतिनिधी आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी, प्रिटिंग प्रेसचे चालक यांची बैठक घेऊन निवडणूक आयोगाची नियमावली सांगण्यात आली आहे. कुणाची अवहेलना करणे हा गुन्हा आहे. तेंव्हा वृत्त प्रसिद्ध करताना त्याची काळजी घ्या, असेही यावेळी सांगण्यात आले.
उमेदवाराला 77 लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. त्यामुळे त्या खर्चामध्येच जाहिराती तसेच इतर खर्च करणे बंधनकारक आहे. त्याहून अधिक खर्च झाल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई केली जाणार आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी हरिशकुमार, माहिती आणि प्रसारण खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, रविंद्र करलिंगण्णावर आदी उपस्थित होते.