भाजप प्रदेशाध्यक्षांकडून स्पष्ट ताकीद
प्रतिनिधी /पणजी
निवडणूक जाहीरच झालेली नाही. उमेदवारही निश्चित झालेले नाहीत. अशावेळी स्वतःची उमेदवारी स्वतःच जाहीर करण्याचा अधिकार कुणालाच नाही, अशी स्पष्ट ताकीद भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली आहे.
व्यक्ती कितीही मोठी असली तरी एखाद्या पक्षाची उमेदवारी स्वतःला मिळणार, असे ती स्वतः घोषित करू शकत नाही. पक्षाची एक प्रक्रिया आणि पद्धती असते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाची निवडणूक समिती जाहीर करण्यात येते. ही समिती किंवा प्रदेश अध्यक्ष हे एखाद्यास उमेदवारी देण्याबाबत केवळ शिफारस करू शकतात. उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार त्यांना नसतो. ही शिफारस संसदीय मंडळास पाठविण्यात येते. या मंडळातर्फे उमेदवार जाहीर करण्यात येतो. तत्पूर्वी पक्षातर्फे त्या त्या मतदारसंघात सर्व संबंधितांशी चर्चा करून संभाव्य उमेदवाराबद्दल त्यांचे मत आजमावण्याची प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे कोणत्याही इच्छुकाने स्वतःची उमेदवारी जाहीर करू नये. अशा उमेदवारीवर भाजप शिक्कामोर्तब करणार नाही, असे तानावडे यांनी स्पष्ट केले.
एखाद्या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदार एकापेक्षा जास्त असू शकतात. त्यामागील कारणे म्हणजे एखाद्या पक्षाची व्याप्ती वाढत गेली म्हणजे इच्छूक तसेच दावेदारांची संख्याही वाढू लागते. एक वेळ अशी होती जेव्हा आम्हाला उमेदवार शोधावे लागत होते. आता उमेदवारी स्वतःला मिळावी असे प्रत्येकालाच वाटते. अशा परिस्थितीत उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करणे वेगळे, आणि स्वतःची उमेदवारी निश्चित झाली म्हणून सांगणे वेगळे. असे जाहीर करणे हे कदापी मान्य होऊ शकत नाही, असे मतही तानावडे यांनी व्यक्त केले.
सर्व मतदारसंघात संसदीय मंडळकडूनच उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. प्रदेश अध्यक्ष या नात्याने मलाही तसा अधिकार नाही, असेही तानावडे यांनी स्पष्ट केले.