प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊनमध्ये कंटाळा आल्यामुळे उरमोडी धरणावर मित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेलेल्या पंताचा गोट (सातारा) येथील जितेंद्र संभाजी माने (वय 51) हे रविवारी बुडाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यु आणि महाबळेश्वर ऍडव्हेंचरच्या पथकाला सोमवारी सकाळी यश आले.
पंताचा गोट येथील जितेंद्र संभाजी माने हे परळी धरणावर फिरण्याकरता रविवारी 2 रोजी दुपारी अंदाजे 12 वाजण्याच्या सुमारास गेले होते. उरमोडी धरणा लगतच हॉटेल सह्याद्री फार्म हाऊस या हॉटेलच्या मागील बाजुलाच धरणाच्या पाण्यात पोहण्याकरता गेले. त्यावेळी पाण्यात बुडुन त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सातारा तालुका पोलीस स्टेशनला मिळताच आ. छ. शिवेंद्रराजे रेस्क्यूला माहिती देऊन तत्काळ उरमोडी धरणावर पाचारण केले. चंद्रसेन पवार (बबलु), अब्दुल सुतार (पिंटु शेठ), देवा गुरव, आदित्य पवार व सुहेल सुतार हे जनता ऍम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी 2 वाजता पोचली.
मृतदेह संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत शोधाशोध सुरू होती. मृतदेह काही सापडला नाही. अंधार पडल्याने शोधण्याचे कार्य स्थगित केले. सोमवारी महाबळेश्वर ट्रेकर्स, छ. शिवेंद्रराजे ट्रेकर्स हे स्पीड बोटच्या साहाय्याने शोधकार्यास सुरुवात केली. 11 वाजता त्यांना मृतदेह शोधण्यात यश आले.
यावेळी तालुका पोलिस स्टेशनचे परळी दूरक्षेत्र बीट अंमलदार डी. बी. बर्गे, पी. एस. आय. देव, पो. कॉ. झी. भी. देवकने, शिवेंद्रराजे रेस्क्युटीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सुनिल भाटीया, चंद्रसेन पवार, अब्दुल सुतार (पिंटु शेठ), अनिल केळगणे, कुमार शिंदे, सुहेल सुतार, अमित कोळी, जयवंत विरामणे, देवा गुरव, आदित्य पवार, संदीप जांभळे, सुनिल वाडकर, व इतर सर्वानी मोलाचे सहकार्य केले.
मृतदेह रुग्णवाहिकेतून सातारा येथे शासकीय रूग्णालयात नेहण्यात आला. पुढील तपास डी.बी बर्गे करत आहेत.