वार्ताहर / औंध
उरमोडीच्या आवर्तनाचे पाणी आज दुपारी खटाव तालुक्यात आल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या टंचाईग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करुन जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल पाठपुरावा केल्या बद्दल तरुण भारतला धन्यवाद दिले.
उन्हाळ्याच्या प्रारंभीच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे भूषणगड, वांझोळी ता खटाव येथील ग्रामस्थ हैराण झाले होते.वांझोळीत गावात नळाला तीन दिवसानंतर एक दिवस पाणी येत होते. त्यातच कोरोनामुळे बाहेरून चाकरमानी गावात आल्यामुळे पिण्याच्या आणि खर्चासाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. पाणी टंचाईच्या झळांनी हैराण झालेल्या वांझोळी ग्रामस्थांनी तरुण भारत कडे आपली कैफियत मांडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि पाण्याचे स्तोत्र बळकट करण्याकरीता उरमोडीच्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
दै तरुण भारतने देखील लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. लोकांची मागणी आणि तरुण भारत मधील व्रत्ताची दखल घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उरमोडीच्या सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांना उरमोडीचे आवर्तन सोडण्याच्या सुचना केल्या होत्या. आवर्तनाबाबत कार्यकारी अभियंता यांनी देखील पाणी सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उरमोडीच्या कालव्यात कधी पाणी येणार याकडे शेतकरी आणि टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या नजरा लागल्या होत्या. आज दुपारी उरमोडी कालव्यातून पाणी खटाव तालुक्यात आल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले.
तरुण भारत नेहमीच मदतीला.
पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जिव्हाळ्याच्या विषयावर दै तरुण भारतने आवाज उठवून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला आहे. लोकांच्या अडचणीसाठी तरुण भारतने नेहमीच पुढाकार घेतला आहे.