बेळगावः राज्यामध्ये 400 उर्दू स्कूल आहेत. त्या शाळा इंग्रजी स्कूलमध्ये वर्ग करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र आम्हाला उर्दू स्कूल हवे असून त्या सर्व शाळा इंग्रजी माध्यमामध्ये वर्ग करू नये, अशी मागणी टिपु सुलतान संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मातृभाषेमधील शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले तर त्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत असतो. मात्र सरकारने आता अनेक शाळा इंग्रजी माध्यमांमध्ये वर्ग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे ते चुकीचे आहे. केवळ उर्दूच नाही तर मराठी, कन्नड या माध्यमाच्या शाळांनाही इंग्रजीमध्ये वर्ग करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ते थांबवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी टिपु सुलतान संघर्ष समितीचे अध्यक्ष अरीफ कटगेरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.