प्रतिनिधी / बेळगाव
महापुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्र व राज्य सरकारने जिल्हय़ाला 857 कोटी दिले होते. त्यामधील 407 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. तर 450 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचेही वितरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली.
पुरात 1 लाख 72 हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱयांना 172 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. 1632 घरे पडलेल्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. ज्यांची संपूर्ण घरे पडली होती, त्यांना ही नुकसानभरपाई दिली गेली आहे. अजूनही सर्व्हे सुरू असून पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. घरे पडली आहेत त्यांनी तातडीने ती बांधावीत व संपूर्ण रक्कम घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. बीडीओ व तलाठी यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासकांचा आदेश नाही
महापालिकेच्या प्रशासकपदी आपली नियुक्ती झाल्याचे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की त्याबाबतचा आदेश मला अजून मिळाला नसल्याचे डॉ. बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले. तुमच्याकडूनच मला ही माहिती मिळाली. मला आदेश मिळताच ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.