आसाममध्ये शांततेची नवी पहाट : 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडले
वृत्तसंस्था /गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे उग्रवादी संघटना ‘उल्फा’ (आय)ला चर्चेच्या टेबलवर आणण्याचा आणि शांतता करारावर स्वाक्षरी करविण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान उग्रवादी संघटनेने यंदाच्या स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार टाकणार नसल्याची घोषणा केली आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच संघटनेने स्वातंत्र्यदिनावर बहिष्कार टाकलेला नसेल.
पण संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या शांतता प्रयत्नांचा उल्लेख केलेला नाही. उल्फा (आय) चे नेते परेश बरुआ यांनी मुख्यमंत्र्यांवर स्वतःचा विश्वास व्यक्त केला आहे. चालू वर्षातील संकट पाहता स्वातंत्र्य दिनी कुठल्याच बंदचे आवाहन करत नाही. कोरोना महामारीमुळे लोक आधीच त्रस्त असल्याचे बरुआ यांनी म्हटले आहे.
आम्ही यंदा कुठल्याही बंदची घोषणा करत नाही आहोत, पण आम्ही लोकांना लोकशाहीच्या मार्गाने आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन करून स्वतःचा विरोध नेंदविण्याचे आवाहन करतो, असे उल्फाने म्हटले आहे.
आम्ही चर्चेच्या विरोधात नाही तसेच हिंसेच्या समर्थनार्थ देखील नाही. पण आम्ही चर्चेसाठी ऐतिहासिक तथ्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. उल्फा (आय)सोबत सार्वभौमत्वावर चर्चा करणे अशक्य असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे. सरकार चर्चेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करू शकते असे उल्फाकडून ‘यंदाबू’ कराराचा दाखला देत म्हटले गेले आहे.