ऑनलाईन टीम / उल्हासनगर :
उल्हासनगरमध्ये काल रात्री 10 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोर ‘साई सिद्धी’ या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज रात्री 9 च्या सुमारास घडली. साई सिद्धी या इमारतीच्या पाचव्या मजल्यापासून ते पहिल्या मजल्यापर्यंतचा स्लॅब कोसळला. या ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्या असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य वेगाने सुरू आहे.या इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींचे शोधकार्य सुरू आहे. जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्याखालून एकूण 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये पुनीत बजोमल चांदवाणी (17 वर्ष), दिनेश बजोमल चांदवाणी (40 वर्ष), दीपक बजोमल चांदवाणी ( 42 वर्ष), मोहिनी बजोमल चांदवाणी (65 वर्ष), कृष्णा इनूचंद बजाज (24 वर्ष), अमृता इनूचंद बजाज (54 वर्ष ) आणि लवली बजाज अशी मृतांची नावे आहेत. तर अलगोत नायडर ( 60 वर्ष) हे जखमी झाले आहेत.
- मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा घटनास्थळाला भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच अशा धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेल्या इमारतीच्या बिल्डरविरोधात कारवाई करण्याचा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहे.