शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरमध्ये स्थिरस्थावर होईपर्यंत वयाची पंचविशी उलटून जाते. त्यानंतर लग्नाचा विचार होतो. सध्या लग्नाचं वय वाढत चाललं आहे. त्यातच करिअर किंवा इतर कारणांमुळे आई होण्याचा निर्णयही पुढे ढकलला जातो. मात्र तिशीनंतर आई होणार्या महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. तुमचीही तिशी उलटून गेली असेल आणि आता आई होण्याचा विचार करत असाल तर काही बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे.
वयाच्या विसाव्या वर्षापासून 29 व्या वर्षापर्यंतचा काळ प्रजननासाठी सर्वोत्तम मानला जातो. या वयात गर्भारपणात फारशी गुंतागुंत होत नाही. सर्व काही सुरळीत पार पडू शकतं. 30 ते 35 या वयातही आई होता येतं. मात्र पस्तीशीनंतर प्रजननक्षमता घटू लागते. गर्भपात, गरोदरपणातली गुंतागुंत अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही अनुवंशिक कारणांमुळेही गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. ठराविक वय उलटून गेल्यानंतर बाळाच्या आरोग्यावरही धोका निर्माण होऊ शकतो. पस्तिशीनंतर इतरही आजार जडू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतो.
चाळीशीनंतर प्रजननक्षमता बरीच कमी झालेली असते. मात्र आधुनिक विज्ञानामुळे चाळीशीनंतरही महिला आई होऊ शकतात. असं असलं तरी या वयात धोकाही बराच जास्त असतो. चाळीशीनंतर आई होताना गर्भपात, बाळाचं वजन कमी असणं, जन्मजात दोष असणं अशा गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. पस्तिशीनंतर आई व्हायचा विचार असेल तर एग फ्रिजिंग करता येतं. वयाच्या 38 व्या वर्षापर्यंत एग फ्रिजिंग शक्य असतं. यामुळे गरोदरपणातला धोका बराच कमी होतो. यासोबतच एआरटी औषधं आणि आयव्हीएफसारख्या तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकते.