पाणी विभागाच्या कामासाठी जावे लागणार वाळपईला : उसगाववासियांना वेळ, मनस्ताप व आर्थिक भुर्दंड
वार्ताहर /उसगाव
उसगाव पंचायतक्षेत्रातील नागरिकांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागात एखादे काम असल्यास आता फोंडा नव्हे तर थेट वाळपईला जावे लागणार आहे. सरकारच्या या विश्वासघातकी निर्णयामुळे उसगाववासियांवर अकारण मनस्ताप व हाल सहन करुन घेण्याची वेळ आली आहे. स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वेळीच या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा या पंचायतक्षेत्रातील लोकांची वेळ आणि अतिरिक्त पैसाही खर्च होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागात काही काम असल्यास उसगाव भागातील नागरिकांना यापूर्वी दाग-फोंडा येथील कार्यालयात जावे लागत होते. उसगावहून हे अंतर जेमतेम दहा किलोमीटर आहे.
प्रशासकीयदृष्टय़ा उसगाव फोंडा तालुक्यातच
प्रशासकीयदृष्टय़ा उसगाव ग्रामपंचायत क्षेत्र फोंडा तालुक्यात येत आहे, त्यामुळे उसगावातील लोकांसाठी तालुक्याचे ठिकाणही फोंडाच आहे. सर्व व्यवहार फोंडा येथे येऊन करणे, हेच उसगाववासियांच्या हिताचे व सोयीस्कर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच व्यवस्था कार्यरत आहे, मात्र आता अचानक उसगाववासियांच्या हिताविरुद्ध निर्णय साबांखाने घेतल्याने उसगाववासियांवर मोठा अन्याय होणार आहे.
उसगाववासियांचे होणार प्रचंड हाल
सरकारच्या नवीन आदेशानुसार उसगाववासियांना आता 22 किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या वाळपई पाणी विभागात जावे लागणार आहे. सध्या पेट्रोलच्या भरमसाठ वाढलेल्या किंमतीमुळे उसगाववासियांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होणार आहे. शिवाय प्रशासकीय कार्यालयात एखादे काम कधी वेळेत होण्याची शाश्वती नसते. त्यामुळे एखाद्या छोटय़ाशा कामासाठीही उसगाववासियांना अकारण मनस्ताप सहन करावा लागणार असून वेळ वाया जाण्याबरोबर आर्थिक भुर्दंडही पडणार आहे. एकंदरीत साबांखाच्या या तुघलकी प्रकारामुळे उसगाववासियांचे प्रचंड हाल होणार आहेत.
उसगाव पर्वीपसून होते फोंडा मतदारसंघात
राजकीयदृष्टय़ा उसगाव गांजे ग्रामपंचायत क्षेत्र पूर्वी विधानसभेच्या फोंडा मतदारसंघात होते. सन 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदारसंघात मतदारसंघ फेररचना होऊन या पंचायतीचा वाळपई मतदारसंघात समावेश करण्यात आला. विश्वजित राणे यांना त्याची कल्पना होती. त्यामुळे सन 2010 सालापासूनच त्यांनी उसगाव भागात दौरे सुरु केले केले होते. येथील काही राजकीय नेते व प्रमुख कार्यकर्त्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. त्यावेळी उसगाव भाग वाळपई मतदारसंघात समावेश करण्यास काही लोकांनी विरोध केला होता. पण नंतर सगळे शांत होऊन उसगाववासियांना फक्त मतदानापुरतेच वाळपई मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले. प्रशासकीयदृष्टय़ा उसगाव पंचायत फोंडा तालुक्यातच राहणार आहे, अशी मूक संमती देऊन हा निर्णय मान्य करण्यात आला होता.
साबांखाचा उसगाववासियांच्या विरोधात निर्णय
सन 2012 सालापासून विश्वजित राणे हे या भागाचे आमदार आहेत. पण आता अचानकपणे दहा वर्षांनंतर सरकारने पाणी विभागात कुठलेही काम असल्यास उसगाववासियांना वाळपईला जावे लागेल असा आदेश जारी केलेला आहे. 1 जुलैपासून तो कार्यान्वित झाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उसगाव वासियांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मतदारसंघ फेररचनेवेळी सरकारने उसगाव पंचायत केवळ मतदानापुरती वाळपई मतदारसंघात राहील व प्रशासकीय व्यवहार फोंडा तालुक्यातच होतील, असे आश्वासन दिले होते. सरकारने आता आपला शब्द फिरविल्याने त्याचा उसगाववासियांना त्रास होणार आहे.
वाळपई म्हणताच उसगाववासियांच्या तोंडचे पळाले पाणाr उसगाव ते फोंडा हे अंतर दहा किलोमिटर तर उसगाव ते वाळपई तब्बल 22 किलोमिटर आहे. प्रवासी बसेसमधून प्रवास करणाऱया लोकांना दर पाच मिनिटाला उसगाव ते फोंडा ये जा करण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. उसगावहून वाळपईला जायचे झाल्यास काही मोजक्याच बसेस आहेत. उसगावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती कामानिमित्त दिवसाकाठी एकदा तरी फोंडय़ात फेरी मारते. या एका फेरीत तो आपली दोन तीन कामे आटोपून घेतो. उसगावातील लोकांचे वाळपईत येणे जाणे तसे खूप कमी असते. पाणी विभागात एखादे काम निघाल्यास आता फोंडाऐवजी वाळपईला जावे लागणार या कल्पनेनेच उसगाववासियांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.