कोरोनामुळे ओढवले संकट : होम क्रेडिट इंडियाचे अध्ययन
कोरोना विषाणूमुळे जगभरात कोविड-19 महामारीशी संघर्ष सुरू आहे. कोविड काळाने लोकांना स्वतःचे घर चालविण्यासाठी उसनवारी करण्यास भाग पाडले आहे. याचा खुलासा होम क्रेडिट इंडिया रिसर्चने केला आहे. प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीने स्वतःच्या मित्र किंवा नातलगांकडून रक्कम उधार घेत स्वतःच्या परिवाराच्या दैनंदिन गरजा भागविल्या आहेत. 2020 मध्ये 14 टक्के लोकांची नोकरी गेली, 46 टक्के लोकांनी स्वतःच्या आवश्यक गरजांसाठी उसनवारी केली, तर 27 टक्के लोकांना स्वतःच्या कर्जाचे मासिक हप्ते भरायचे आहेत.
मुंबई आणि भोपाळमध्ये सर्वाधिक (27 टक्के) लोकांनी उसनवारी केली आहे. यानंतर दिल्लीत 26 टक्के लोकांनी तर पाटण्यात 25 टक्के लोकांनी हा मार्ग अवलंबिला आहे. 2019 मध्येही 46 टक्के लोकांनी उसनवारी केली होती आणि 33 टक्के लोकांनी स्वतःचे राहणीमान उंचावण्यासाठी कर्ज घेतले होते. परंतु यंदा महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर अत्यंत प्रतिकूल प्रभाव पडला आहे. उद्योगक्षेत्रात वेतनकपात आणि नोकरी गमवावी लागल्याने कनिष्ट मध्यमवर्गीय कुटुंबांवर वाईट प्रभाव पडला आहे.
मित्र किंवा नातलगांकडून कर्ज
सामान्य काळापेक्षा कोविडदरम्यान लोकांनी स्वतःचे मित्र किंवा नातलगांकडून कर्ज घेण्यास प्राधान्य दिले आहे, कारण अशा स्थितीत त्यांना कर्ज फेडण्यास सवलत मिळते आणि स्थिती सुरळीत झाल्यावर, नोकरी मिळाल्यावर आणि वेतनाचा क्रम योग्य झाल्यावर सहजपणे असे कर्ज फेडता येते. 50 टक्के सहभागी लोकांनी स्थिती सुरळीत झाल्यावर कर्ज फेडल्याचे अध्ययनात समोर आले आहे. 13 टक्के लोकांनी कर्जाची रक्कम भरल्यावर उसनवारी फेडणार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई अन् भोपाळ आघाडीवर
मित्र अन् कुटुंबीयांकडून कर्ज घेण्याप्रकरणी मुंबई आणि भोपाळ ही शहरे आघाडीवर राहिली आहेत. तेथे 27 टक्के लोकांनी अशा माध्यमांतून कर्ज घेतले आहे. दिल्लीत 26 टक्के आणि पाटण्यात 25 टक्के लोकांनी मित्र आणि नातलगांकडून कर्ज घेतले आहे. मित्र किंवा नातलगांकडून कर्ज घेण्याचा निर्णय कुटुंबातील पुरुष सदस्यांनी घेतल्याचे अध्ययनात दिसून आले आहे. 23 टक्के प्रकरणांमध्ये असेच घडले आहे. सर्वेक्षणात सामील महिला कर्ज न घेणे किंवा कुठल्यातरी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्याच्या मताच्या राहिल्या आहेत. त्यांनी मित्र किंवा नातलगांकडून कर्ज घेण्यास प्राधान्य दिलेले नाही.
अध्ययनाचे स्वरुप
युरोप आणि आशियात सक्रीय आंतरराष्ट्रीय कंझ्यूमर फायनान्स सेवा प्रदाता कंपनी होम क्रेडिटची स्थानिक शाखा होम क्रेडिट इंडियाने टाळेबंदीदरम्यान लोकांमधील कर्जाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी 7 शहरांमध्ये विस्तृत अध्ययन केले आहे. कर्ज घेण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण स्वतःचे राहणीमान उंचावणे असल्याचे यात दिसून आले आहे. राहणीमान उंचाविण्यात नवा स्मार्टफोन, टीव्ही किंवा फ्रीज तसेच वाहन खरेदी करण्यासारखे प्रकार सामील आहेत.
कठोर भूमिका घ्या
महामारीसंबंधी कठोर पावले न उचलणाऱया देशांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. कठोर पावले उचलण्याची वेळ अद्याप निघून गेलेली नाही. आताच पावले न उचलल्यास स्थिती हातातून निसटू शकते. जगाच्या नेत्यांनी एकत्रितपणे या महामारीला सामोरे गेले पाहिजे असे डब्ल्यूएचओचे महासंचालक ग्रेब्रियस यांनी म्हटले आहे.