सोलापूर येथे केलेल्या कोरोना चाचणीत झाले स्पष्ट
प्रतिनिधी/उस्मानाबाद
जिल्हा प्रशासनाच्या अथक परिश्रमामुळे सध्या उस्मानाबाद जिल्हा हा सध्यातरी कोरोनामुक्त असून, यासाठी प्रशासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवायला सुरूवात केली आहे. इतर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात येणार्या लोकांवर विशेष लक्ष ठेवून असतानाच चिखली या गावातील एका पोलिस कर्मचार्याची सोलापूर येथे कोरोना चाचणी केल्यानंतरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र खळबळ उडाली असून, चिखली गाव संपूर्णतः सील करण्यात आले आहे. व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे आरोग्य यंत्रणेने संपर्क साधत स्वॅब नमुने घेतले असून ते तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिल्य चिकित्सक राज गलांडे यांनी दिली आहे.
सदर कर्मचारी हा सोलापूर येथे बंदोबस्तासाठी होता. गेल्या आठवड्यात म्हणजेच दि. 24 एप्रिल रोजी सुट्टीनिमित्त आपल्या मूळ गावी म्हणजे चिखली येथे आले होते. त्यानंतर ते सोलापूर येथे बंदोबस्तासाठी गेले असता त्यांची कोरोना तपासणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिखली गावासह जिल्ह्यात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण त्यांच्या संपर्कात किती व्यक्ती नेमके संपर्कात आले हे सांगणे कठीण आहे. परंतु आरोग्य यंत्रणेने सतर्कता दाखवित त्यांच्या संपर्कातील त्यांच्या कुटुंबातील व मित्र परिवारातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात यश मिळविले असून ते सोलापूर येथे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावते की काय? अशी भिती सर्वसामान्य नागरिकांमधून होत व्यक्त होत आहे.
यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तीन रूग्ण होते. मात्र त्यांच्या केलेल्या वैद्यकीय उपचारानंतर त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळेच उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये आला होता. आता मात्र त्या कर्मचार्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या रिपोर्टवरतीच सर्व कांही अवलंबून आहे.कारण त्यांचे रिपोर्ट जर निगेटीव्ह आले तरच जिल्हा कोरोनामुक्त व भयमुक्त होईल. अन्यथा परत एकदा जिल्हा कोरोनाच्या दृष्टचक्रात सापडेल की काय अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खबरदारीचे उपाय म्हणून चिखली हे गाव सील करण्यात आले आहे.