बळीराजाच्या आंदोलनास ग्रामपंचायतींसह महिला संघटनांचा पाठिंबा
वार्ताहर/ कराड
चालू गळीत हंगामासाठी उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळावा. तसेच पहिली उचल म्हणून एकरकमी एफआरपीची रक्कम मिळावी, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने गेल्या सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनास आता गावागावांतून पाठिंबा वाढू लागला आहे. शनिवारी बनवडी ग्रामपंचायतीसह अनेक महिला संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा देत शेतकऱयांसाठी आता जिजाऊंच्या लेकी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.
शनिवारी बनवडी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास कारंडे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, पल्लवी संदीप साळुंखे आदींची उपस्थिती होती. तर आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनेही आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी स्वाती पिसाळ, विद्या मोरे, शांता कोठावळे, अधिम विकास परिषद मानव संरक्षक सेवा संघ लोकशासनतर्फेही आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी सुमन कोळी, अधिम विकास राज्य महिला प्रमुख प्रिया सुहास आलेकरी, मानवाधिकार सेवा संघ महाराष्ट्र सचिव पूजा भातकर, जनता क्रांती दलाच्या जिल्हाध्यक्षा सुनिता कोळी, सुनिता भोसले आदी महिला पदाधिकाऱयांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
सर्व पाठिंब्याची पत्रे बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला व पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलन सुरू झाल्यापासून सातारासह परजिल्हय़ातील शेतकरी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा देत आहेत. या आंदोलनाला महिलांचाही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पंजाबराव पाटील यांनी सांगितले. सरकारने शेतकऱयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; अन्यथा 2013 च्या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा साजीद मुल्ला यांनी दिला आहे.
मंगळवारी साखर आयुक्तांची बैठक
आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी प्रशासन व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांची एक बैठक झाली. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही. आता साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे एम.डी. व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. मंगळवार 16 रोजी पुणे येथे ही बैठक होणार आहे.