सरकारकडून 5.23 कोटीचा निधी मंजूर : प्रति टन रु. 1800 बँक खात्यात जमा होणार
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱयांना आता आधारभूत किंमत मिळणार असून त्यासाठी सरकारने 5.23 कोटीचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक ऊस शेतकऱयाला प्रती टन 1,800 रुपये आधारभूत किंमत मिळणार आहे. शुक्रवारी ऊस उत्पादकांची मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली. त्यावेळी कृषीमंत्री बाबू कवळेकर व सहकारमंत्री गोविंद गावडे उपस्थित होते.
गेल्या बुधवारपासून ऊस उत्पादक शेतकऱयांनी उजगाव येथील संजीवनी साखर कारखान्यासमोर उपोषण सुरू केले होते. नंतर मुख्यमंत्र्यांनी भेटण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. काल शुक्रवारी मुख्यमंत्री शेतकऱयांना भेटले आणि आधारभूत किमंत देण्याचे जाहीर केले.
आज शनिवारपासून आधारभूत किमंत देण्यास सुरुवात करणार असल्याचे सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. सरकार 5.23 कोटी रुपये आधारभूत किमंत म्हणून शेतकऱयांसाठी देणार असून शेतकऱयांना रु. 1,800 प्रती टन आधारभूत किमंत देण्यात येणार आहे. हे पैसे शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा केले जातील. ऊस लागवडीचे प्रती टन 600 रुपये शेतकऱयांनी मागणी केली होती. मात्र हे पैसे नंतर खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दक्षिण गोव्यातील सांगे व पेपे तालुक्यात एकूण 800 ऊस उत्पादक शेतकरी आहेत. गोव्यात साधारणतः 30 हजार मेट्रिक टन ऊस दरवर्षी पिकविला जातो. राज्यातील संजीवनी साखर कारखान्यात या उसांवर प्रक्रिया केली जात होती. 2018 सालापर्यंत हा प्रकर सुरू होता. नंतर दुरुस्तीसाठी कारखाना बंद करण्यात आला. सध्या गोव्यातील ऊस शेजारील राज्यात जात असला तरी संजीवनी कारखाना लवकरच पुन्हा सुरू करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.