प्रतिनिधी / सातारा :
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि. 15 ऑक्टोबरला सन 2021-22 चा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. परंतु आज 15 दिवस उलटूनही काही दोन कारखाने वगळता कोणीही ऊस दर जाहीर केला नाही. ही बाब ऊस दर नियंत्रण कायदा 1966 चा भंग करणारी आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, अशा कारखान्यावर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
गेल्या वर्षीच्या हंगामात सुध्दा अश्याच प्रकारे काही कारखान्यांनी एक रक्कमी ऊस दर दिला व बाकी कारखाने ऊस दराचे बेकायदेशीर तुकडे करुन साखर आयुक्त यांना चुकीची व खोटी माहिती कळवुन कोणताही कायदा न पाळता 15 टक्के व्याज शेतकऱ्यांना न देता यंदा कारखाने चालु केले आहेत. तसेच खोटी कागदपत्रे सादर करत 100 टक्के ऊसबिल 31 ऑगस्टपूर्वी दिले असे दाखवत 8 ते 9 महीने शेतकऱ्यांचे करोडो रुपये फुकट वापरले आणि शासना बरोबर शेतकऱ्यांची सुध्दा फसवणुक केली असल्याची माहिती यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आली.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष राजु शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जून साळुंखे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, पक्षाध्यक्ष सातारा देवानंद पाटील आदी उपस्थित होते.