बावणेच्या अर्धशतकासह महाराष्ट्राच्या 2 बाद 219 धावा
पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्रविरूद्ध ओडिसा यांच्यात गहुंजे मैदानावर सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडचे नाबाद शतक आणि कर्णधार अंकित बावणे याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर महाराष्ट्राने बुधवारी दुसऱया दिवस अखेर 2 बाद 219 धावांसह दमदार सुरुवात केली. या आधी ओडिसाचा पहिला डाव 293 धावांत संपुष्टात आला. त्यात राजेश धुपेर याने शतकी खेळी केली.
ओडिसाने कालच्या 220 धावांपासून आज पुढे खेळण्यास सुरूवात केली. ओडिसा आज मोठी धावसंख्या उभी करेल, असे वाटत असताना महाराष्ट्राच्या अक्षय पालकर, सत्यजित बच्छाव, मुकेश चौधरी अहणि मनोज इंगळे यांनी ओडिसाला 293 धावांवर रोखले. यात अक्षयने 29 षटकांत 81 धावांच्या मोबदल्यात 4 गडी, सत्यजित बच्छाव आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी 2 बळी, तर मनोजने 1 गडी बाद केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या डावाची सुरूवात खराब झाली, तरी ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार अंकित बावणे यांनी महाराष्ट्राचा डाव सावरला. यात ऋतुराज गायकवाडने 181 चेंडूत 9 चौकार 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा, तर अंकित बावणेने 184 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 80 धावा केल्या. त्यांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने आजच्या दिवसअखेर 2 बाद 219 धावांपर्यंत मजल मारली आहे.