ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना भुर्दंड
अन्यथा शाळेत प्रवेश देणार नाही!
वार्ताहर / सावंतवाडी:
सध्या शाळा बंद पण शिक्षण सुरू हा फॉर्म्युला राज्य सरकारचा आहे. पण
प्रत्यक्षात वर्ग सुरू नाहीत. तर ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा मिळत नाही. परंतु शहरी भागात सध्या काही नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन शिक्षणासाठी ऍप सुरू केली आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा भुर्दंड पालकांना सोसावा लागत आहे.
काही संस्थांनी नवनीत, दीक्षा ऍपद्वारे शिक्षण सुरू केले आहे. सदर ऍपसाठी आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सक्ती केली जात आहे. ऍप व ऑनलाईन शिक्षणासाठी तुम्ही जर सहकार्य केले नाही तर तुम्हाला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. तुम्हाला ऑनलाईन शिक्षण ग्रुपमधून कमी केले जाईल, अशा स्वरुपाचा दम विद्यार्थी व पालकांना दिला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी सध्या मोबाईलमध्ये दिवसरात्र गुंतलेले दिसत आहेत. पालकांच्या खिशालाही फटका बसत आहे.
आधीच ‘कोरोना’मुळे उद्योग, व्यवसाय, नोकरी नाही. हाती पैसा नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह, वीज, पाणी बिल त्यात मोबाईल रिचार्ज, शाळा ऍपसाठी हजार-पाचशे रुपये त्यामुळे शाळा बंद असूनही शिक्षण खर्चिक झाले आहे. शिक्षण विभागाने आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा डिसेंबरअखेरपर्यंत शाळा, शिक्षण बंदच राहणार आहे. मुलांनी शिक्षणाचे धडे घरातच गिरवावेत. पाठय़पुस्तकाच्या आधारावर घरातच अभ्यास करावा, असे एक धोरण निश्चित करावे, अशी मागणी सर्वसामान्य गोरगरीब, पालकवर्गातून होत आहे. शहरी भागातील मोठय़ा विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा ऑनलाईन शिक्षणाचा बागुलबुवा करून पालक व विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावा, अशी मागणी होत आहे.
खासगी क्लास सुरू
इंजिनिअरिंग, आयटी क्षेत्रातील वर्गाचे क्लास ऑनलाईन सुरू केले आहेत. त्याचा भुर्दंडही विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाबाबत ठावठिकाणा नाही. असे असताना ऑनलाईन शिक्षणाचा भडीमार करून पालक, विद्यार्थी, शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. शहरात दहावी-बारावी खासगी क्लास सुरू आहेत. मग शाळांचे दहावी, बारावीचे क्लास घेण्यास परवानगी का नाही, असा सवाल व्यक्त होत आहे.