नवी दिल्ली
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वात जलद सेवेची हमी देणाऱया योजनेसंदर्भात एअरटेल आणि वोडाफोनला ट्रायने (टेलिफोन रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया) खडेबोल सुनावले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने यासंदर्भात दोन्ही कंपन्यांना अशा प्रकारच्या खास योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन्ही कंपन्यांनी अलीकडेच ठराविक गटातील ग्राहकांना अधिक वेगाची सेवा देण्याची योजना आखली होती. यावरून इतर ग्राहकांना अशी सेवा मिळत नाहीत का अशी अनेकांनी शंका उपस्थित केली होती. ट्रायने यासंदर्भात विशेष योजना मागे घेण्याच्या सूचना दोन्ही कंपन्यांना दिल्या आहेत. फक्त खास गटांसाठी अशा प्रकारची खास सेवा का असा प्रश्न अनेकांनी केला आहे. सामान्य ग्राहकांनाही उत्तम सेवा मिळणे गरजेचे असल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. ट्रायने या सुचनेसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन्ही कंपन्यांना सात दिवसांचा अवधी दिला आहे.