प्रतिनिधी /बेळगाव
अतिजलद प्रवास म्हणून ओळखल्या जाणाऱया विमान प्रवाशांसाठी परिवहनने वातानुकूलित बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. कोरोनानंतर बस, रेल्वे व विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेली बससेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.
परिवहनने सध्या रेल टू एअर या नावाने विमानतळ ते रेल्वेस्थानकापर्यंत विशेष बस सुरू केली आहे. या बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. आतापर्यंत 2 हजार 366 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित बस सोडावी. यापूर्वी विमानतळावर बस नव्हती. त्यामुळे प्रवाशांना खासगी टॅक्सी व रिक्षांचा आधार घ्यावा लागत होता. यासाठी 700 ते 800 रुपये भाडे मोजावे लागत होते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून परिवहनने विमानतळ ते रेल्वेस्थानकावर विशेष बसची सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर झाले आहे.
मंदिरे, पर्यटनस्थळे व इतर सर्वच व्यवहार सुरळीत झाल्याने विमानाने प्रवास करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई, बेंगळूर, हैद्राबाद, दिल्ली आदी ठिकाणी प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळावर वातानुकूलित आराम बसची सुविधा पुरवावी, अशी मागणी जोर धरून आहे.
सुरक्षित प्रवासासाठी बसची गरज
बेंगळूरसाठी सकाळच्या सत्रात विमानाची मागणी आहे.
यानुसार विमान कंपन्या आणि केंद्रीय कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. विमानांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळावर सुरक्षित प्रवासासाठी बसची गरज आहे.
राजेशकुमार मौर्य (संचालक, विमानतळ प्राधिकरण)
मागणीनुसार वातानुकूलित बस सुरू करणार
सध्या रेल टू एअर ही विशेष बससेवा सुरू आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर मागणीनुसार वातानुकूलित बस सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. विमानांच्या वेळेनुसार प्रवाशांसाठी बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रणाधिकारी परिवहन)