कराचीतील नागरिक भयभीत : पाकिस्तानवर भारताची करडी नजर
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानचे वायुदल सध्या एका युद्धाभ्यासात (वॉरगेम) सामील झाले आहे. या वॉरगेमला ‘नेम हाय मार्क’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय वायुदलाने या वॉरगेमवर करडी नजर ठेवली आहे. फेबुवारी 2019 मध्ये भारताने घडवून आणलेल्या बालाकोट येथील एअरस्ट्राइकला नजरेसमोर ठेवून पाकिस्तानने या वॉरगेमचे आयोजन चालविले आहे.
परंतु पाकिस्तानचे नागरिक स्वतःच्या वायुदलाच्या सरावामुळे दहशतीत आले आहेत. पाक नागरिकांनी स्वतःच्या लढाऊ विमानांना भारतीय लढाऊ विमाने समजून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे. भारतीय लढाऊ विमाने कराची आणि बहावलपूरमध्ये उड्डाण करत असल्याची अफवा समाजमाध्यमांवर मंगळवारी रात्री पसरली होती.
पाकिस्तान वायुदलाच्या (पीएएफ) या वॉरगेममध्ये त्याची सर्व लढाऊ विमाने सहभागी झाली आहेत. यात जेएफ-17, एफ-16 आणि मिराज 3 सामील आहे. पीएएफने यासंबंधीची माहिती देशातील नागरी उड्डाण मंत्रालयाला दिली आहे.
रात्रभर उड्डाण
पाकिस्तान वायुदल रात्रीच्या वेळी उड्डाण करण्याचा सराव करत आहे. मंगळवारी रात्री कराचीच्या आकाशात पाकिस्तानी लढाऊ विमाने दिसून आली आहेत. मागील आठवडय़ातच पाकने अशाचप्रकारचा सराव केला होता. तेव्हा हंदवाडा येथील चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल हुतात्मा झाले होते. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदल पुन्हा एअर स्ट्राइक घडवून आणणार असल्याची भीती पाकिस्तानला सतावत होती.
पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या 12 दिवसांनी भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक घडवून आणला होता. पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ भारतीय वायुदलाने उद्ध्वस्त केले हेते. तर त्याच्या दुसऱया दिवशी पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न वायुदलाने उधळून लावला होता.