ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कंपनीतील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार आहे. यासाठी सरकारने खरेदीदारांकडून प्रस्ताव मागितले आहेत. त्यामुळे लवकरच याची लिलाव प्रक्रिया सुरु होईल. मात्र, एअर इंडियाच्या या विक्री व्यवहारावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, हा व्यवहार संपूर्णपणे देशविरोधी असून आता मला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही. आपण आपल्या कुटुंबातील मौल्यवान वस्तू विकू शकत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या लिलाव पत्रानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसमधील 100 टक्के भाग भांडवल विकला जाणार आहे. त्याचबरोबर एअर इंडिया आणि एसएटीएसची जॉईन्ट व्हेंचर कंपनी असलेल्या ‘एआयएसएटीएस’ मधील एअर इंडियाचा 50 टक्के हिस्सा विकला जाणार आहे. एअर इंडियाच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणही जो लिलाव जिंकेल त्या कंपनीला मिळणार आहे.