वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यत देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन आहे. यानंतर सरकार घेणाऱया निर्णयाकडे आमचे लक्ष असेल, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली. 14 एप्रिलनंतर विमान कंपन्या आपली सेवा सुरू करतील. तिकिटांची नोंदणी सुरू होईल, असे 2 एप्रिल रोजी नागरी उड्डायण सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी सागितले होते. मात्र एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यानंतर नागरिकांना सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये 10 टक्के कपात होईल, असे जाहीर केले होते. याला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर कोणत्याही कामगाराचा पगारात कपात करू नका, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, याचे स्मरणही यांनी व्यवस्थापनाला करून दिले आहे.