ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणूकीची प्रक्रिया आज संपुष्टात आली. एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिगटाने टाटा समुहाची निवड केली आहे. त्यामुळे 67 वर्षांनंतर जेआरडी टाटांनी सुरू केलेली एअरलाईन्स पुन्हा टाटा समुहाकडे आली आहे.
एअर इंडियावरील मालकी हक्कासाठी चार निविदा आल्या होत्या. त्यामध्ये टाटा सन्स आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सर्वाधिक बोली लावली. मात्र, यात टाटा सन्सने बाजी मारली. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीगटाने एअर इंडियाची मालकी टाटा सन्सकडे सोपवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांमध्ये केंद्रीय पातळीवरून निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. डिसेंबरपर्यंत टाटा सन्सला एअर इंडियाचा मालकी हक्क मिळू शकते.
उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी 1932 मध्ये एअर इंडियाची स्थापना केली. या एअरलाईन्सचे सुरुवातीचे नाव ‘टाटा एअरलाईन्स’ होतं. 1953 मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्सचे राष्ट्रीयकरण केले. त्यानंतर त्याचे नावही बदलण्यात आले. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एअर इंडिया आणि देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी इंडियन एअरलाईन्स अशा दोन स्वतंत्र कंपन्या सरकारने सुरू केल्या. मात्र, चुकीच्या निर्णयांमुळे मागील काही वर्षांपासून ही कंपनी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे या कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ती प्रक्रिया आज पूर्ण झाली. येत्या काही दिवसांत मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल.