ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडियाच्या लिलावाला केंद्र सरकारने दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. पहिल्या मुदतवाढीच्या कालावधीत ही कंपनी खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने केंद्र सरकारने दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे, ही मुदतवाढ 30 जून पर्यंत असणार आहे.
कोविड -19 साथीच्या आजारामुळे जगभरातील आर्थिक घडामोडी विस्कळीत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून एअर इंडिया सरकारने विक्रीस काढली आहे. खरेदीदार पुढे येत नसल्याने दोन वेळा या लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या मुदतवाढीची विक्री प्रक्रिया 27 जानेवारी पासून सुरू केली होती. त्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. आता ही मुदत 2 महिन्यांनी वाढवण्यात आली आहे.
कर्जबाजारी एअर इंडियावर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. परंतु, अटीनुसार कंपनी खरेदीदाराला फक्त 23,286.5 कोटी रुपयांच्या कर्जाची जबाबदारी घ्यावी लागेल. बाकीचे कर्ज सरकार उचलेल. 37000 कोटींच्या कर्जाचा बोजा सरकार उचलणार आहे. करारानुसार, जो कोणी एअर इंडिया खरेदी करण्यास सक्षम असेल, त्याला कंपनीचे व्यवस्थापन सोपविण्यात येईल. केंद्र सरकारने या लिलावाच्या बोलीसदर्भात कागदपत्रे जाहीर केली आहेत.