नवी दिल्ली :
टाटा सन्स कंपनी एअर एशिया इंडिया या हवाई कंपनीच्या भागीदारीतून बाहेर पडणार असल्याचे जवळच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या एअर एशिया नुकसानीत आहे. टाटा ग्रुपची कंपनी टाटा सन्सचा एअर एशियात 51 टक्के हिस्सा आहे तर उर्वरीत 49 टक्के वाटा मलेशियाच्या एअर एशियाकडे आहे. एअर एशियाचा भारतातील हवाई क्षेत्रातील वाटा 7.8 टक्के इतका आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई कंपन्या तोटय़ात चालल्या असून हे पाहता टाटा सन्सने भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. एअर एशिया या आंतरराष्ट्रीय हवाई कंपनीला आशिया प्रशांत भागात 29 अब्ज डॉलर्सचे नुकसान या वर्षी झाल्याचे सांगण्यात येत आहे तर जागतिक स्तरावर हे नुकसान 83 अब्ज डॉलर्सचे असल्याचे बोलले जाते. 2020 हे वर्ष तर हवाई उद्योगाला सर्वाधिक फटका देणारं ठरलं आहे. एप्रिलपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान सेवा बंद पडल्याने कोटय़ावधीचे नुकसान कंपन्यांना सोसावे लागले आहे. याचा परिणाम एअर एशियावरही मोठय़ा प्रमाणात झाला. 2014 मध्ये भारतात सेवा सुरू केल्यावर कंपनीने चांगली प्रगती साधली. पण आता नुकसान मोठं झाल्याने टाटाने अखेर यातून बाहेर पडण्याचे निश्चित केले आहे. कंपनी पूर्णपणे सेवा देणाऱया ‘विस्तारा’ एअरलाइन सेवेवर सारं लक्ष केंद्रित करणार आहे, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. या ‘विस्तारा’त सिंगापूर एअर लाईन्सचा सर्वाधिक भागीदारीचा वाटा आहे.