वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी घेतले जाणारे आशियाई पात्र फेरीचे फुटबॉल सामने 2021 सालापर्यंत लांबणीवर टाकल्याने आता भारतीय फुटबॉल संघ चालू वर्षांच्या कालावधीत खेळाविना राहणार आहे. कोरोना महामारी परिस्थितीमुळे आशिया पात्र फेरी फुटबॉल स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकल्याची घोषणा आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने केली आहे.
2022 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा आणि 2023 च्या अशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणारे पुरूषांच्या पात्र फेरीचे सर्व फुटबॉल सामने कोरोना महामारीतीमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षींच्या नोव्हेंबरमध्ये भारतीय फुटबॉल संघाने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मस्कत येथे ओमान संघाविरूद्ध खेळला होता. या सामन्यात ओमानने भारताचा 1-0 असा पराभव केला होता. या पराभवामुळे भारतीय फुटबॉल संघाचे विश्व करंडक पात्र फेरीच्या स्पर्धेतील पुढील फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान संपुष्टात आले असले तरी 2023 साली होणाऱया आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्याची शक्यता संपुष्टात आलेली नाही. भारतीय फुटबॉल संघाचा कतार बरोबरचा परतीचा सामना आठ ऑक्टोबर रोजी मायदेशात आयोजित केला होता. त्यानंतर भारताचे उर्वरित सामने अफगाण आणि बांगलादेश यांच्याबरोबर नोव्हेंबर महिन्यात खेळविले जाणार होते पण आता हे पात्र फेरीचे सामने वर्षभराच्या कालावधीकरिता लांबणीवर टाकण्यात आले आहेत. 2023 आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाने आपल्या गटातून तिसरे स्थान मिळविले असून आता या संघाला तिसऱया फेरीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. कोरोना महामारी परिस्थिती बिकट होत असल्याने फिफा व एएफसी यांनी संयुक्तपणे पात्र फेरीचे सामने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इ गटात भारत सध्या पाच सामन्यांतून 3 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या गटात कतार 13 गुणांसह पहिल्या तर ओमान 12 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे.