मतभेदांमुळे आता वेळ वाया जाऊ नये : राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा
वृत्तसंस्था/ अलीगढ
अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य यंत्रणेद्वारे मंगळवारी संबोधित केले आहे. 56 वर्षांमध्ये लालबहादुर शास्त्राr यांच्यानंतर एएमयूत भाषण करणारे मोदी दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी विद्यापीठाचा इतिहास, तेथील संशोधन आणि महिला शिक्षणावर बोलताना धर्मनिरपेक्षतेवरही विचार मांडले आहेत. आम्ही कुठल्या धर्मात वाढलो यापेक्षा आपण देशाच्या आकांक्षांशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. मतभेदांमुळे बराच वेळ वाया गेला असून आता मिळून नवा आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा असल्याचे मोदी म्हणाले.
नव्या शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांच्या गरजा विचारात घेण्यात आल्या आहेत. सद्यकाळातील तरुणाई नव्या आव्हानांवर मार्ग शोधत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात तरुणाईच्या याच आकांक्षांना प्राथमिकता देण्यात आली आहे. 2014 मध्ये 16 आयआयटी होते, आता त्यांची संख्या 23 झाली आहे. 6 वर्षांपूर्वी देशात केवळ 6 एम्स होते, तर आता हे प्रमाण 22 झाले आहे. शिक्षणाची संधी सर्वांना मिळावी याकरता काम सुरू असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले आहे.
राजकारण प्रतीक्षा करू शकते
आम्हा सर्वांना एकत्रितपणे काम करायचे असून याचा लाभ सर्व 130 कोटी देशवासीयांना होणार आहे. राजकारण समाजाचा महत्त्वाचा हिस्सा आहे, परंतु समाजात आणखीही महत्त्वाचे मुद्दे असल्याचे समजून घ्यावे लागेल. राजकारण-समाज प्रतीक्षा करू शकतो, परंतु विकास प्रतीक्षा करू शकत नसल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
मुलींच्या शिक्षणावर भर
एएमयूत मुस्लीम मुलींची संख्या 35 टक्के झाली आहे. लैंगिक भेदभाव होऊ नये, सर्वांना समान अधिकार मिळावा हे एएमयूच्या स्थापनेवेळी नमूद करण्यात आले होते. मुलींना अधिकाधिक उच्चशिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. एकेकाळी देशात मुस्लीम मुलींचा ड्रॉपआउट रेट (शिक्षण अर्ध्यावर सोडून देणे) 70 टक्क्यांहून अधिक होता. 70 वर्षांपासून हीच स्थिती राहिली, अशा स्थितीत स्वच्छ भारत मोहीम सुरू झाली, शौचालयांच्या निर्मितीनंतर हाच दर आता 30 टक्क्यांवर आला आहे. पूर्वी मुली स्वच्छतागृह नसल्याने शिक्षण सोडून द्यायच्या, परंतु आता असे घडत नसल्याचे मोदी म्हणाले.
भेदभावरहित योजना
भेदभावाशिवाय कोरोनाकाळात 80 कोटी लोकांना धान्य पुरविण्यात आले. कुठलाही भेदभाव नसलेली आयुष्मान योजना सुरू झाली. जे देशाचे आहे, ते देशाच्या लोकांना मिळायलाच हवे. एएमयूच्या कुलगुरुंनी लसीकरणात सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एएमयुत लाखो विद्यार्थ्यांदरम्यान मिनी इंडिया दिसून येते. उर्दूसोबतच हिंदी-इंग्रजी आणि अनेक भाषा शिकविल्या जातात. कुराणसोबत भगवद्गीता आणि जगातील अनेक ग्रंथही येथे असल्याचे मोदी म्हणाले.
देशहिताकरता मतभेद बाजूला ठेवावेत
तरुणाईकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. त्यांनी आतापर्यंत चर्चेत न आलेल्या स्वातंत्र्यसेनानींचा शोध घ्यावा. आत्मनिर्भर भारताला बळकट करण्यासाठी एएमयूमधून सूचना मिळाल्यास उत्तम ठरेल. आम्ही कुठे आणि कुठल्या कुटुंबात जन्मलो, कुठल्या धर्मात वाढलो, याहून देशाशी जोडले जाणे मोठे आहे. वैचारिक मतभेद असतात, परंतु जेव्हा देशाच्या लक्ष्याचा मुद्दा असतो तेव्हा ते सर्व बाजूला ठेवावेत, असे मोदी म्हणाले.