ममता बॅनर्जी यांचे भाजपविरोधी पक्ष नेत्यांना पत्र
कोलकाता / वृत्तसंस्था
चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असतानाच तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी नेत्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी, भाजपकडून लोकशाहीवर सुरु असलेल्या हल्ल्याविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याची हीच वेळ असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यासह भाजपेतर सरकार असलेल्या राज्यांमधील पाच मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी हे पत्र पाठवले आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून येथे तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत रंगल्याचे चित्र आहे. याचदरम्यान निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असतानाच ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या सात पानी पत्रामध्ये भाजपवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. लोकशाही व संविधानावर सुरु असलेल्या भाजपच्या हल्ल्यांविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज ममता बॅनर्जी यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
पत्रामध्ये राजधानी दिल्लीसाठी मंजूर करण्यात आलेल्या एनसीटी विधेयकासह 7 घटनांचा उल्लेख करत त्यांनी भाजपवर ओरखडे ओढले आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपची कृती लोकशाही व संघराज्य पद्धतीविरोधी असल्याचे म्हटले आहे. विरोधकांच्या एकीतून जनतेसमोर भाजपला सक्षम पर्याय उभा करण्याचा उल्लेखही या पत्रामध्ये आहे.
पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजपशासित राज्यांमध्ये भाजप राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग करून लोकनियुक्त सरकारला अडथळे निर्माण करीत आहे. राजधानी दिल्लीसाठी मंजूर करण्यात आलेल्या एनसीटी विधेयक ‘गंभीर’ असून केंद्रातील भाजप सरकारने लोकनियुक्त सरकारचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
…या नेत्यांना लिहिले पत्र
ममता बॅनर्जी यांनी हे पत्र देशातील 5 मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजपविरोधी नेत्यांना लिहिले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासह के. एस. रेड्डी, फारुख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि दीपांकर भट्टाचार्य यांचा समावेश आहे. पत्रात सर्व विरोधी पक्षांनी लोकशाही वाचविण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
…….