ऑनलाईन टीम / मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 9 वाजता आपआपल्या घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे दिवे किंवा टॉर्च लावून कोरोना विरोधात लढा देण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे 9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका उदभवू शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या राज्यात, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र या सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.तसेच जनतेनेही आवश्यक तितकेच लाईट चालू ठेऊन, दिवे, मेणबत्ती इ. लावावेत असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जनतेला केले आहे.
राऊत म्हणाले, लॉकडाऊनमुळे इंडस्ट्री लोड पूर्णतः झिरो झाले आहे. 13 हजार मेगावँट विजेवर केवळ अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. सर्वांनी अचानक दिवे बंद केल्यास सर्व पॉवरस्टेशन हायफ्रिक्वेन्सीवर जाऊ शकतात. परिणामी आपल्या ग्रीडमध्ये अनावश्यक फीडर ट्रीपिंग्स येऊ शकतात. मोठ्या प्रमाणात पॉवर डिमांड असलेल्या महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात वीज फेल्युरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडल्यास मल्टी स्टेट ग्रीड फेल्युर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.