अनेक खुनांना वर्षानुवर्षे उलटली तरी तपास रखडलेलाच : प्रियजनांच्या आठवणींनी कुटुंबीय व्याकूळ, मोकाट मारेकऱयांपर्यंत पोहोचण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान
रमेश हिरेमठ /बेळगाव
कोंडसकोप, ता. बेळगावजवळील हणमंतवारी माळावर आढळून आलेल्या मानवी कवटीचे गूढ अद्याप कायम आहे. ही कवटी आणि हाडे महिलेची की पुरुषाची? याचाही उलगडा झाला नाही. विधिविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांनी त्याचे डीएनए काढून ठेवले आहेत. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न उकललेल्या अनेक खून प्रकरणांची आठवण बेळगावकरांना झाली आहे. काही ठळक प्रकरणात तर पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांपर्यंत पोहोचता आले नाही. वर्षानुवर्षे काही प्रकरणांचा तपास रखडलेलाच आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या हे एक तत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. अशा प्रकरणांच्या तपासासाठी त्यांनी विशेष पथकाची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे.
एखाद्या खून प्रकरणाचा तपास होत नाही, त्यावेळी ज्याचा खून झाला आहे त्याच्या कुटुंबीयांची अवस्था दयनीय होते. खून तर झाला आहे, मारेकरी कोण? याचे उत्तर मिळत नाही. तोवर त्यांच्या मनातील गोंधळ संपत नाही. मारेकरी मात्र खून पचवून उजळ माथ्याने फिरत असतात. बेळगाव शहर आणि परिसरात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. वर्षांनुवर्षे पाठपुरावा करूनही मारेकरी कोण? याचा तपास लागला नाही. यातील काही प्रकरणे सीआयडीकडे आहेत. सीआयडीनेही तपासात हात टेकले आहेत.
21 वर्षांपूर्वी कसाई गल्ली येथील सोनाली गुंडप (वय 9) या चिमुरडीचा किल्ला परिसरात खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. 22 एप्रिल 1998 रोजी मार्केट पोलीस स्थानकात सोनालीच्या कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक पोलिसांच्या हातून तपास झाला नाही म्हणून हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले. सोनालीचे मारेकरी कोण, याचा शोध सीआयडीही घेऊ शकली नाही.
मार्केट पोलिसांनी सुरुवातीला काही संशयितांची चौकशी केली. तरीही सोनालीचा खून कोणी केला? याचा उलगडा झाला नाही. तिच्या कुटुंबीयांना आजही कळत नाही की खून करण्यासारखा गुन्हा या चिमुरडीने काय केला होता? कुठल्या नराधमांनी तिचा गळा घोटला? याची उत्तरे पोलीस यंत्रणा देऊ शकली नाही.
हॉटेल व्यावसायिक भालचंद्र शेवडे (वय 48) यांच्या खुनाला 17 वर्षे उलटली. नरगुंदकर भावे चौक येथील कृष्णा हॉटेलचे संचालक भालचंद्र हे हॉटेल बंद करून घरी जाताना 29 ऑक्टोबर 2004 रोजी रात्री कांबळी खुटाजवळ अज्ञातांनी गोळय़ा झाडून भालचंद्र यांचा खून केला. त्याचवेळी खडेबाजार पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 वर्षे उलटली तरी मारेकरी कोण? याचा तपास लागला नाही.
अनगोळ येथील गगन नरेश सोमनाचे (वय 8) या निष्पाप बालकाच्या खुनाचे गूढही उकलले नाही. घरासमोर खेळता खेळता अचानक बेपत्ता झालेल्या गगनचा 12 नोव्हेंबर 2010 रोजी आपल्याच घरासमोरील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. टिळकवाडी पोलीस स्थानकात कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात तर तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले. स्वतंत्र यंत्रणा राबविली. तरी आजतागायत त्याचा छडा लागला नाही.
गगनच्या कुटुंबीयांसह काही संशयितांची पॉलिग्राफ चाचणी झाली आहे. मारेकऱयांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विधिविज्ञान शाखेचाही पूर्ण उपयोग केला. तरी छडा लागला नाही. तपासाला गती मिळावी यासाठी गगनच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांनाच लक्ष्य बनविले. मारहाण करण्यात आली. धमक्मया देण्यात आल्या. आजही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मारेकरी कोण, याचा 11 वर्षांनंतरही उलगडा झाला नाही.
निष्पापांचे खून करणारे मारेकरी मोकाट
मूळचा उदगीर, जि. लातूर येथील निशिकांत दहीकांबळे (वय 31) या युवकाचा 26 नोव्हेंबर 2020 रोजी मारिहाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील कबलापूरजवळ खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. एका कंपनीत
मॅनेजर म्हणून काम करणाऱया निशिकांतच्या खून प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. त्याचे कुटुंबीय उदगीरला राहतात. त्याच्या खुनानंतर पत्नी-मुलांनी बेळगाव सोडले. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठीही येथे कोणीच नाहीत. पोलिसांनी गांभीर्याने तपास केला नाही. आता तर त्यांनी प्रयत्नही सोडल्याचे दिसून येते. अशा अनेक प्रकरणात वर्षांनुवर्षे मारेकरी कोण, याचा शोध लागला नाही. म्हणून निष्पापांचे खून करणारे त्यांचे मारेकरी मोकाट सुटले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र ‘तपास सुरू आहे’ हे तयार उत्तर देत वेळ मारून नेते आहे.
10 मे 2017 रोजी द्वारकानगर, मंडोळी रोड, टिळकवाडी येथील भार्गवी मोरप्पन्नवर (वय 58) या महिलेचा भरदुपारी खून झाला होता. घरात हातपाय बांधून गळा दाबून भार्गवी यांचा खून केल्याचे उघडकीस आले होते. पाच वर्षे होत आली तरी या गृहिणीचा मारेकरी कोण, याचा शोध लागला नाही. टिळकवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे.
बहुतेक प्रकरणात अपयश
कोंडुसकोपजवळ 30 जानेवारी 2022 रोजी मानवी कवटी व हाडे सापडली आहेत. केवळ कवटी व हाडांवरून गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण आहे. किमान ही कवटी कोणाची, याचा शोध घेणेही पोलीस दलासाठी आव्हानात्मक आहे. 18 मार्च 2014 रोजी किल्ला भाजी मार्केटजवळ प्लास्टिकच्या पिशवीत एका महिलेचे दोन पाय व दोन हात सापडले. त्याच दिवशी मार्केट पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्या दुसऱया दिवशी यरमाळजवळ एका पुलाखाली खून झालेल्या महिलेचे धड सापडले. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला. दोन ठिकाणी सापडलेले अवयव एकाच महिलेचे आहेत काय? याचाही उलगडा होऊ शकला नाही. त्यानंतर 4 जानेवारी 2020 रोजी याच परिसरात एका महिलेचे हात-पाय सडलेल्या अवस्थेत सापडले. या प्रकरणीही मार्केट पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचाही अद्याप उलगडा झाला नाही. खून झालेली व्यक्ती कोण? याचा उलगडा होऊ नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळय़ा ठिकाणी टाकले जातात. अशा प्रकरणांचा छडा लावणे पोलीस दलासाठी आव्हान ठरते. बहुतेक वेळा हे आव्हान पेलण्यात तपास अधिकारी अपयशी ठरतात, त्यावेळी गुन्हेगार सुखेनैव जगत असतात. या प्रकरणांचाही तपास सुरू आहे. गूढ उकलण्यात मात्र पोलीस दलाला अपयश आले आहे.